गेली अनेक वर्षे अभिनेता भरत जाधव हा त्याच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आला आहे. चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून आपल्या हसऱ्या चेहऱ्याने भरत जाधव नेहमी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतो. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. काही महिन्यांपूर्वी भरत कुटुंबीयांसह मुंबईबाहेर स्थायिक झाला. आता मुंबई सोडण्याचा निर्णय का त्याने घेतला याचे कारण सांगितले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून भरत त्याच्या कुटुंबीयांबरोबर कोल्हापूरला राहत आहे. त्याच्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत होता, त्याच्या नाटकाचे प्रयोगही हाऊसफुल होत होते. पण अशातच त्याने कोल्हापूरला स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे चाहते अवाक झाले. पण आता हा निर्णय घेण्यामागे काय विचार केला होता याचा खुलासा त्याने केला आहे.

हेही वाचा : “आम्हाला त्यांनी २ दिवस कोंडून ठेवले, जेवण दिले नाही अन्…”; ‘बलोच’च्या निर्मात्याने सांगितला शूटिंगदरम्यान आलेला भयानक अनुभव

‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “मुंबई हे शहर आता बिझनेस हब झाले आहे. मुंबईच्या सध्या असलेल्या वेगाशी मी जुळवून घेणे मला कठीण वाटत आहे. त्या वेगाशी जुळवून घेण्यासाठी माझे वय सरत चालले आहे. परंतु आपल्याजवळ पैसे हवेत आणि आरोग्याकडेही लक्ष द्यायला हवे म्हणून मी मुंबईबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. मुंबईत काम करून मिळणारे पैसे आणि इथे होणारा खर्च हा सारखाच आहे. खर्च भागवण्यासाठी आपण पैसे कमावतो असे मला वाटू लागले.”

आणखी वाचा : मुंबई: भरत जाधव म्हणतात ‘वाहिन्यांवर ‘टीआरपी’चा खेळ सुरू’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे तो म्हणाला, “या सगळ्यासाठी करावी लागणारी धावपळ आता माझ्या वयाला झेपणारी नाही हे मला जाणवले. त्यामुळे पैसे तर कमवायचे पण खर्च कमी करायचा, असे मी ठरवले. या सगळ्या आर्थिक बाबींचा विचार करून मी कोल्हापूरला स्थायिक होण्याचे ठरवले. आम्ही तिथे राहावे, अशी माझ्या आईची इच्छा होती म्हणून आम्ही तिथे राहायला गेलो.” आता भरत जाधवचे हे बोलणे चर्चेत आले आहे.