Abhishek Bachchan Recalls first meeting with Aishwarya Rai: ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन हे बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडपे आहे. अभिषेक बच्चन नुकताच ‘हाऊसफुल ५’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे कौतुकदेखील होताना दिसत आहे.
अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय हे अनेकदा चर्चेत असतात. त्यांच्या नात्याचीदेखील मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसते. २०२१ साली अभिषेक बच्चनने एका मुलाखतीत ऐश्वर्या रायबरोबर त्याची पहिली भेट कशी होती, यावर वक्तव्य केले होते.
अभिषेक बच्चन काय म्हणालेला?
२०२१ मध्ये अभिषेक बच्चनने ‘द रणवीर शो’मध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्याने ऐश्वर्या राय बरोबरच्या पहिल्या भेटीत काय घडलेले याची आठवण सांगितली होती. ऐश्वर्या राय तिचा बॉलीवूडमधील पहिल्या चित्रपटाचे म्हणजेच ‘और प्यार हो गया’चे शूटिंग करत होती. याच चित्रपटात बॉबी देओलदेखील प्रमुख भूमिकेत होता. तो माझा चांगला मित्र आहे, त्यामुळे मी त्याला भेटण्यासाठी चित्रपटाच्या सेटवर गेलो होतो. त्यावेळी त्याने मला जेवणासाठी आमंत्रित केले. त्याचवेळी माझी व ऐश्वर्याची पहिली भेट झाली. ती भेट कायम आठवणीत राहिली, कारण मी जे बोललो ते तिला समजलंच नाही.
अभिषेक बच्चन म्हणाला की, त्या पहिल्या भेटीत मी जे ऐश्वर्याशी बोललो ते तिला समजलेच नाही. आजही ऐश्वर्या त्या भेटीबद्दल बोलते तेव्हा गमतीने म्हणते की तुम्ही त्यावेळी जे बोललात त्यातील एक शब्दही मला समजला नाही. मी त्यावेळी ज्या पद्धतीने बोलत होतो, ते शब्द बहुतेक अवघड असतील आणि त्याचे उच्चार मी वेगळ्या पद्धतीने करत असेन. याचे कारण सांगत अभिषेक बच्चन म्हणाला की, मी काही वर्षे शिक्षणासाठी बोस्टनमध्ये होतो. याबरोबरच अभिनयाचे प्रशिक्षणदेखील इंग्रजीमध्ये झाले आहे, त्यामुळे त्यावेळी माझी बोलण्याची पद्धत, शब्द त्याचे उच्चार वेगळे असतील, त्यामुळे माझे बोलणे ऐश्वर्याला समजले नव्हते.
ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांनी २००७ साली लग्नगाठ बांधली. त्यांना आराध्या ही मुलगी आहे. आराध्या व ऐश्वर्या या मायलेकींची जोडीदेखील अनेकदा लक्ष वेधून घेते. आराध्या अनेक कार्यक्रमांना ऐश्वर्याबरोबर हजेरी लावते. आता ‘हाऊसफुल ५’ नंतर अभिषेक बच्चन कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.