२३ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये अभिनेता अभिषेक बच्चन याने स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे. अमिताभ बच्चनसारखं नाव जरी मागे जोडलं गेलं असलं तरी चित्रपटसृष्टीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी अभिषेक बच्चनला बरीच मेहनत घ्यावी लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची तुलना सतत त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि वडील अमिताभ बच्चन यांच्याशी होताना दिसते. त्याच्यापेक्षा वडील अन् बायको जास्त काम करतात असं म्हणत बऱ्याचदा अभिषेकला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं.

नुकतंच एका मुलाखतीमध्ये अभिषेकने २०१६ च्या ‘हाऊसफूल ३’नंतर घेतलेल्या ब्रेकबद्दल खुलासा केला आहे. बऱ्याच चित्रपटातून त्याने बाहेर पडायचा निर्णय घेतला याबद्दलही त्याने भाष्य केलं आहे. बऱ्याच निर्मात्यांना त्यांचे पैसेदेखील परत केल्याचं अभिषेकने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे. २०१६ नंतर फक्त २०१८ च्या ‘मनमर्जियां’ या एकाच चित्रपटात अभिषेक झळकला.

आणखी वाचा : शाहरुख खानचं ‘ते’ सुपरहीट गाणं सुखविंदर सिंग यांनी अनवाणी पायांनी रेकॉर्ड केलेलं; गायकाने सांगितला किस्सा

‘इ-टाईम्स’शी संवाद साधतांना अभिषेक म्हणाला, “मला चांगलं काम मिळत होतं, चित्रपट मिळत होते, पैसेही मिळत होते पण मला स्वतःला आंतरिक समाधान मिळत नव्हतं. प्रत्येक चित्रपटात तुम्ही अगदी सहज कोणतेही कष्ट न घेता काम करत असाल तर ते तसं होता कामा नये, एखादं काम उत्तमरित्या करण्यासाठी तुमची झोप उडायला हवी. त्यामुळेच मी थांबायचं ठरवलं, सायनिंग अमाऊंट म्हणून घेतलेले पैसे मी निर्मात्यांना परत केले. मी त्यांना सांगितलं की मला पुन्हा एकदा विचार करायचा आहे, मी तो ब्रेक सत्कारणी लावला अन् असेच चित्रपट किंवा कथा स्वीकारल्या ज्यामुळे माझी झोप उडेल, मला काहीतरी आव्हानात्मक केल्याचं समाधान मिळेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या ब्रेकनंतर मात्र अभिषेकने वेगवेगळ्या चित्रपटात काम केलं. ओटीटीवर आलेल्या ‘दसवी’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचं कौतुक झालं. याबरोबरच ‘ब्रीद – इनटू द शॅडोज’ या वेब सीरिजमध्येही अभिषेकने आव्हानात्मक भूमिका निभावली. अजय देवगणच्या ‘भोला’मध्ये अभिषेकचा छोटा कॅमिओदेखील आपल्याला पाहायला मिळाला. सध्या तो आर बल्की यांच्या ‘घूमर’ या चित्रपटावर काम करत आहे.