चित्रपटात छोट्या छोट्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जावेद खान अमरोही यांचं मुंबईत निधन झाले. त्यांचं वय ५० वर्ष एवढं होतं. श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानंतर गेले काही दिवस ते उपाचर घेत होते. केवळ चित्रपटच नव्हे तर टेलिव्हिजन क्षेत्रातही जावेद यांचं भरपूर मोठं योगदान आहे. जावेद यांच्या निधनामुळे संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली.
अभिनेत्याच्या एका जवळच्या व्यक्तीने या बातमीची खातरजमा केली आहे. तसेच त्या व्यक्तीने ‘टाईम्स नाऊ’ या माध्यमाशी संवाद साधताना यावर भाष्य केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “जावेद खान यांना श्वसनाचा त्रास होता. गेले वर्षभर ते अंथरूणाला खिळूनच होते. सांताक्रूझच्या सूर्या नर्सिंग होममध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते आणि तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची दोन्ही फुफ्फुसं निकामी झाली होती.”
आणखी वाचा : आदित्य चोप्राने ‘हा’ सल्ला दिला अन् ‘हम आपके है कौन’ हा चित्रपट ठरला हीट; सुरज बडजात्यांनी सांगितला किस्सा
जावेद खान यांचे मित्र, सहकलाकार आणि एक उत्कृष्ट अभिनेते अखिलेंद्र मिश्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली. मीडियाशी संवाद साधताना ते म्हणाले, “हे खूप मोठं नुकसान आहे. ते एक उत्कृष्ट अभिनेते होते, याबरोबरच ते मला सीनियर होते.माझ्या सुरुवातीच्या काळात मी त्यांच्याबरोबर नाटकांमध्ये काम केलं आहे. सध्याच्या तरुण अभिनेत्यांना देण्यासारखं ज्ञान त्यांच्याकडे भरपूर होतं.”
अखिलेंद्र मिश्रा आणि जावेद खान यांनी ‘लगान’मध्ये एकत्र काम केलं, पण चित्रपटात त्यांना म्हणावं तसं काम मिळालं नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “चित्रपटसृष्टीने जावेद खान यांच्यातील कलागुणांचा नीट वापर केलाच नाही. लोकांनी फक्त त्यांची ऊंची पाहिली आणि त्यांना विनोदी भूमिकांच्या साच्यात फिट बसवलं. त्यांच्यातील खऱ्या कलाकाराचं रंगमंचावरदर्शन व्हायचं. चित्रपटात त्यांना अपेक्षित होतं तेवढं काम आणि मानमरातब मिळाला नाही.” जावेद खान यांनी तब्बल १५० चित्रपटात काम केलं आहे. ‘कुली नंबर १’, ‘लगान’, ‘चक दे इंडिया’, ‘अंदाज अपना अपना’सारख्या कित्येक चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहेत.