Aishwarya Rai Bachchan Shares Cannes Memories: बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने नुकतीच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. तिने पारंपरिक वेशभूषेतून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तिच्या या लूकचे सर्वांनीच कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.
अनेक कलाकारांनी ऐश्वर्याला क्वीन म्हणत तिचे कौतुक केले होते. आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिने जो लूक केला होता, तो कसा तयार झाला इथपासून ते कान्स रेड कार्पेटवर जेव्हा अभिनेत्री आली तिथेपर्यंतचे क्षण पाहायला मिळत आहे.
ऐश्वर्याने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली साडी नेसली आहे. पांढऱ्या रंगाच्या या साडीवर बरेच नक्षीकामदेखील केले आहे. यामध्ये मनीष मल्होत्रा ऐश्वर्याच्या पोशाखाचे डिझाइन तयार करतानादेखील दिसत आहे. अभिनेत्री जेव्हा ही साडी नेसून कान्सच्या रेड कार्पेटवर आली, तेव्हा तिने भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले, असे अनेकांनी म्हटले होते. या व्हिडीओमध्ये रेड कार्पेटवरील तिचे काही फोटोदेखील आहेत, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
या व्हिडीओची विशेष बाब म्हणजे अभिनेत्रीने हा व्हिडीओ शेअर करताना पती अभिषेक बच्चनच्या चित्रपटातील गाणे लावले आहे. अभिषेक बच्चनच्या गुरू चित्रपटातील तेरे बिन हे गाणे या व्हिडीओच्या पार्श्वभूमीला ऐकायला मिळत आहे. ‘गुरू’ चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता.
नेटकरी म्हणाले…
अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करीत तिचे कौतुक केले आहे. मनीष मल्होत्राने हार्ट इमोजी शेअर केल्याचे पाहायला मिळाले, तर एका नेटकऱ्याने लिहिले, “तू या जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आहेस”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहले, “तू खरी क्वीन आहेस”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “जगातील सर्वात सुंदर स्त्रियांपैकी तू एक आहेस.”



कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्यासह तिची लेक आराध्यादेखील दिसली होती. आराध्या अनेकदा तिच्या आईसह अनेक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसते. अनेकदा ती शाळा सोडून तिच्या आईबरोबर का दिसते, असे विचारण्यात येते. ऐश्वर्याने एका मुलाखतीत या प्रश्नाचेदेखील उत्तर दिले होते. अभिनेत्री म्हणालेली, “आराध्या सगळीकडे माझ्याबरोबर असते, कारण माझ्या मल्टिटास्किंग आयुष्याचा ती भाग आहे. मी सगळ्या गोष्टी तिच्यापुढे शक्य तितक्या खऱ्या ठेवते. इतर कोणत्याही सामान्य मुलीप्रमाणे ती सध्या शाळेत शिक्षण घेत आहे. पण जेव्हा ती लहान होती, तिथल्या लहान मुलांबरोबर तिने खेळावे यासाठी मी तिला प्ले-पार्कमध्ये घेऊन जायचे.
“मुंबईत या सगळ्या गोष्टी करणे अवघड होते. मात्र, जेव्हा मी इतर ठिकाणी जात असते, तेव्हा मी तिला तिथल्या पार्कमध्ये घेऊन जात असते. तिथेसुद्धा आम्हाला ओळखणारे लोक भेटतात. पण, ते सामान्य पालक आणि लहान मुले असतात. आराध्याचे आयुष्य सामान्य आहे. मी तिला समजावून सांगितले आहे की, हे माझे आयुष्य आहे आणि ती माझ्या आयुष्याचा भाग आहे.”