Aishwarya Rai in Devdas : ‘देवदास’ हा चित्रपट ऐश्वर्या रायच्या प्रसिद्ध चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेला अनेकांची पसंती मिळाली होती. यामध्ये शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित हे कलाकार झळकले होते. हा चित्रपट त्यावेळी चांगलाच गाजला होता. यामध्ये एक सीन आहे, जो आजही खूप प्रसिद्ध आहे. तो सीन म्हणजे ‘देवदास’मध्ये चित्रपटाच्या शेवटी ऐश्वर्या पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये देवदासला (शाहरुख खान) शेवटचं पाहण्यासाठी धावत जात असते. सोशल मीडियावर हा सीन आजही अनेकदा पाहायला मिळतो. अशातच नुकतंच या चित्रपटाची कॉस्च्युम डिझायनर नीता लुल्ला हिने या सीनबद्दल आणि यामध्ये ऐश्वर्याने परिधान केलेल्या पाढंऱ्या रंगाच्या साडीबद्दल सांगितलं आहे.

ऐश्वर्याने या सीनमध्ये परिधान केलेली साडी नीता लुल्लाने एका रात्रीत तयार केल्याचं तिने म्हटलं आहे. ‘न्यूज १८’ शी संवाद साधताना नीताने संजय लीला भन्साळी आणि ‘देवदास’ चित्रपटाबद्दल सांगितलं आहे. ती म्हणाली, “‘देवदास’मधील ऐश्वर्याचा तो पाढंऱ्या साडीतील लूक तयार करण्यासाठी माझ्याकडे फक्त एका रात्रीची मुदत होती. या चित्रपटात पाहायला मिळत असलेल्या सर्व साड्या या १२ ते १४ मीटर लांब आहेत. मला चित्रपटातील ऐश्वर्याच्या शेवटच्या सीनसाठी दोन ते तीन साड्या कापून त्यातून फायनल लूक तयार करावा लागला होता. संजय यांना सीनसाठी दुर्गा पूजेला वापरली जाते तशी कॉटनची साडी पाहिजे होती. आमच्याकडे तशी साडी होती आणि आम्ही पूर्ण तयारीसुद्धा केलेली.”

नीता पुढे म्हणाली, “संजय यांनी त्यांची या साडीच्या पदराला शेवटी आग लागते अशी कल्पना असल्याचं सांगितलं आणि त्यासाठी त्यांना ही साडी छोटी वाटत आहे असं म्हणाले. ते ऐकल्यानंतर मी लगेचच माझ्या संपूर्ण टीमसह कामाला लागले. रात्री ११ वाजता एका दुकानात जाऊन साडीसाठी लागणारं कापड खरेदी केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत आम्ही ती साडी पूर्णपणे तयार केली होती.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘देवदास’ चित्रपटाबद्दल बोलायचं झालं, तर ‘देवदास’ संजय लीला भन्साळी यांच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. २००२ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये शाहरुख खानने देवदास मुखर्जीची भूमिका साकारली होती. ऐश्वर्या रायने त्याची पत्नी पारोची भूमिका साकारली, तर माधुरीने चंद्रमुखीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. चित्रपटाला पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. त्यातील एक पुरस्कार हा चित्रपटातील वेशभूषेसाठी देण्यात आला होता.