बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा केवळ भारतातच नाही जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. एकेकाळी अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचं बॉक्स ऑफिसवर एकहाती वर्चस्व होतं. आजही अमिताभ बच्चन यांचा अभिनय आणि उत्साह नव्या कलाकारांना लाजवणारा असाच असतो. त्यांना भेटण्यासाठी त्यांचे चाहते दर रविवारी त्यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गर्दी करतात. विशेष म्हणजे बिग बीसुद्धा आपल्या चाहत्यांना तेवढ्याच उत्साहाने आणि आपुलकीने भेटतात. चाहत्यांचं त्यांना पाहण्यासाठी गर्दी करणं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असल्याचंही ते सांगतात. अमिताभ बच्चन जेव्हाही त्यांच्या चाहत्यांना भेटण्यासाठी येतात तेव्हा त्यांना भेटण्याआधी ते नेहमीच चप्पल काढतात. याचं कारण त्यांनी नुकतंच सांगितलं आहे.

अमिताभ बच्चन यांनी नुकतंच त्यांच्या एका ब्लॉगमध्ये ‘जलसा’बाहेर जमणाऱ्या चाहत्यांमध्ये आता घट होत असल्याचं म्हटलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या मते आता चाहत्यांमध्ये आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी पूर्वीसारखा रोमांच आणि उत्साह राहिलेला नाही. बिग बींनी आपल्या याच ब्लॉगमध्ये चाहत्यांना भेटण्याआधी ते नेहमी चप्पल का काढून ठेवतात याचं कारणही स्पष्ट केलं आहे. त्यांनी सांगितलेलं हे कारण खूपच खास आहे.

आणखी वाचा- KBC 14: ऐश्वर्याने सासऱ्यांना शिकवला होता रॅम्प वॉक? अमिताभ यांनी सांगितला किस्सा

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या लेटेस्ट ब्लॉगमध्ये चाहत्यांच्या भेटीचे काही फोटो शेअर करताना चाहत्यांना भेटण्याआधी चप्पल काढणं म्हणजे चाहत्यांप्रती आपली भक्ती असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी लिहिलं, “माझ्या हितचिंतक आणि चाहत्यांना भेटण्याआधी मी शूज किंवा चप्पल काढतो… ही माझ्यासाठी त्यांच्याप्रती असलेली भक्ती आहे.” आपल्या ब्लॉगमध्ये ते पुढे लिहितात, “माझ्या लक्षात आलंय की आता चाहत्यांच्या संख्येत घट झाली आहे. उत्साह कमी झाला आहे. लोकांचा आनंदाने ओरडण्याच्या आवाजाची जागा आता कॅमेराने घेतली आहे. हे सगळं सांगतं की आता वेळ बदलली आहे आणि कोणतीही गोष्ट कायमची राहत नाही.”

आणखी वाचा- “इंटिमेट सीन्स का करत नाहीस?” परदेशी पत्रकाराच्या प्रश्नावर भडकली होती ऐश्वर्या राय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अमिताभ बच्चन ८० च्या दशकापासून अनेक वर्ष ‘जलसा’बाहेर चाहत्यांना भेटतात. आपल्या चाहत्यांना हात हलवून अभिवादन करतात. त्यांच्या या भेटीला काही चाहत्यांनी ‘दर्शन’ असं नावही दिलं आहे. करोनाच्या काळात अमिताभ यांनी चाहत्यांना भेटणं बंद केलं होतं. मात्र आता मागच्या काही महिन्यापासून हे सर्व पुन्हा सुरू झालं आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये चाहत्यांच्या भेटीचे बरेच फोटोही शेअर केले आहेत.