दिग्दर्शक मधुर भांडारकर हे नेहमीच त्यांच्या चित्रपटातून वेगवेगळे महत्वाचे विषय हाताळत असतात. आता ते त्यांच्या ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटातून ते कोविड काळातील टाळेबंदीवर भाष्य करणार आहेत. हा चित्रपट लवकरच ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने एका मुलाखतीमध्ये मधुर भांडारकर यांनी त्यांच्या स्ट्रगलबद्दल खुलासा केला आहे.

युट्यूबवरील ‘द बॉम्बे जर्नी’ या कार्यक्रमात नुकतीच मधुर भांडारकर यांनी हजेरी लावली आणि त्यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाबद्दल खुलासा केला. केवळ फिल्ममेकर व्हायचं हे स्वप्न उराशी बाळगून या क्षेत्रात आलेल्या मधुर यांच्या वडिलांचा व्यवसाय ठप्प झाल्यावर त्यांची आर्थिक परिस्थिती फार बिकट झाली होती. अशातच त्यांनी वेगवेगळी कामं केली. चित्रपटाची आवड असल्या कारणाने त्यांनी त्या काळात घरोघरी जाऊन व्हिडिओ कॅसेट पोहोचवायचं कामदेखील केलं. याविषयी मधुर यांनी या मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.

आणखी वाचा : रविना टंडनच्या ‘भोपाळ डायरीज’चा व्हिडिओ व्हायरल; अभिनेत्रीने मारला समोशावर ताव अन्…

मधुर भांडारकर म्हणाले, “माझ्या वडिलांचा व्यवसाय ठप्प झाला आणि त्यावेळी आमची आर्थिक परिस्थिती फार बिकट होती. शिवाय चित्रपटाचं मला एवढं वेड होतं की त्यादरम्यान मी शाळेतही नापास झालो. नंतर मी व्हिडिओ कॅसेटचा व्यवसाय सुरू केला. तब्बल साडे तीन ते चार वर्षं मी या व्यवसायात होतो. मी घरोघरी जाऊन व्हिडिओ कॅसेट द्यायचो. सुरुवातीला काही महीने मी एका व्हिडिओ लायब्ररीमध्ये कम केलं आणि नंतर मी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. खार, पालीहिल, बांद्रा, जुहू या मुंबईच्या परिसरात घराघरात जाऊन मी कॅसेट विकायचो. इथून माझी खरी सुरुवात झाली, आणि तेव्हा मी ठरवलं की मला फिल्ममेकर व्हायचं आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मधुर भांडारकर यांनी ‘पेज ३’, ‘ट्राफिक सिग्नल’, ‘चाँदनी बार’, ‘फॅशन’ अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. आता त्यांच्या आगामी ‘इंडिया लॉकडाउन’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. कोविड काळात देशातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला, शिवाय या काळात सामान्य माणूस कशा रितीने भरडला गेला यावर मधुर भांडारकर यांनी या चित्रपटाच्या मध्यमातून प्रकाश टाकला आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर, प्रतीक बब्बर, श्वेता बासु प्रसाद, आहाना कुमरा आणि प्रकाश बेलवाडी या कलाकारांनी काम केलं आहे. हा चित्रपट २ डिसेंबर रोजी ‘झी ५’या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.