Sunita Ahuja and Govinda Divorce Update: गेल्या काही महिन्यांपासून गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा हे चर्चेत आहेत. फेब्रुवारी २०२५ मध्ये ते दोघे घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, गोविंदाच्या वकिलाने त्यांच्यात सर्व काही सुरळीत सुरू असून, ते एकत्र असल्याचे म्हटले होते.

सुनीता आहुजा यांनीदेखील अनेक मुलाखतींमध्ये गोविंदा, त्याचे काम, तसेच त्यांच्या नात्यावर वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा सुनीता आहुजा यांनी गोविंदाबरोबर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

काही रिपोर्टसनुसार सुनीता आहुजा यांनी वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. तसेच, अभिनेत्यावर काही गंभीर आरोपदेखील केले आहेत.

हॉटरफ्लायने दिलेल्या वृत्तानुसार हिंदू विवाह कायदा, १९५५ च्या कलम १३ (१) (i), (ia) आणि (ib) अंतर्गत सुनीता आहुजा यांनी याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये सुनीता आहुजा यांनी ३८ वर्षांनंतर त्यांना का घटस्फोट घ्यायचा आहे, याचे कारण सांगितले आहे. त्यात अफेअर, अत्याचार तसेच एकटे सोडल्याचे आरोप त्यांनी गोविंदावर केले आले आहेत.

गोविंदाचे वकील काय म्हणाले?

आता गोविंदाचे वकील ललित बिंद्रा यांनी ‘एनडीटीव्ही’शी संवाद साधला. ललित बिंद्रा यांनी सुनीता आहुजा यांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्याच्या वृत्तावर वक्तव्य केले. ते म्हणाले, “त्यांनी कोणताही घटस्फोटाचा अर्ज दाखल केलेला नाही. त्यांच्यात सर्व काही ठीक आहे. लोक जुन्या गोष्टींबाबत चर्चा करीत आहेत आणि त्यावरुून अफवा पसरवत आहेत.”

तसेच ते पुढे असेही म्हणाले, “आता गणेश चतुर्थी येईल, तुम्हाला सर्व जण एकत्र दिसतील.” गेल्या काही महिन्यांपासून सुनीता आहुजांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे गोविंदाबरोबरच्या त्यांच्या नात्यामध्ये काही अडचणी असल्याच्या चर्चा होत आहेत.

सुनीता आहुजा यांनी असे म्हटले होते की, वर्षांपासून मी एकटी माझा वाढदिवस साजरा करते. त्या असेही म्हणालेल्या की, मी आणि गोविंदा वेगळे राहतो. त्याचे कारण म्हणजे गोविंदा खूप बोलतो आणि त्याचे कामही असते. त्याबरोबरच काही दिवसांपूर्वी सुनीता आहुजा यांनी त्यांच्या यूट्यूब व्लॉगमध्ये घटस्फोटाबद्दल वक्तव्य करीत त्या रडल्या होत्या. जे कोणी माझे घर फोडण्याचा प्रयत्न करील, त्याला देवी माफ करणार नाही, असेही त्या म्हणाल्या होत्या.

दरम्यान, आता गोविंदा आणि सुनीता आहुजा या घटस्फोटांच्या चर्चांवर प्रतिक्रिया देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.