अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हे त्रिकूट पुन्हा एकदा ‘हेरा फेरी ३’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं जाहीर तेव्हापासूनच चाहते मंडळींमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र, बाबू भैय्या म्हणजेच अभिनेते परेश रावल यांनी या चित्रपटात काम करणार नसल्याचं जाहीर करताच अनेक चाहत्यांच्या आनंदावर पाणी फिरलं. परेश रावल ‘हेरा फेरी ३’ मध्ये नसणार हे आता अधिकृत झाले आहे. त्यांनी स्वतः चित्रपटातून बाहेर पडण्याची घोषणा केली होती.
परेश रावल यांच्या एक्झिटच्या घोषणेनंतर अक्षय कुमारची ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ कंपनीद्वारे त्यांना २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याचे वृत्त आले. त्यानंतर आता इंडियन एक्स्प्रेसनुसार असं वृत्त येत आहे की, परेश यांनी ही रक्कम अक्षयच्या प्रोडक्शन हाऊसला १५ टक्के व्याजासह परत केली आहे. ‘बॉलीवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, या चित्रपटासाठी परेशचे एकूण मानधन १५ कोटी रुपये निश्चित करण्यात आलं होतं.
परेश यांनी त्यांना देण्यात आलेले ११ लाख रुपये, १५ टक्के व्याजासह परत केल्याचे वृत्त आहे. चित्रपटातून बाहेर पडल्याबद्दल त्यांनी १५% वार्षिक व्याज आणि काही अतिरिक्त रक्कम भरपाई म्हणून परत केली आहे. परेश यांच्या करारात चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या एका महिन्यानंतर उर्वरित रक्कम, १४.८९ कोटी रुपये मिळतील असे म्हटले होते. याला परेश यांचा आक्षेप होता.
हा चित्रपट २०२६ किंवा २०२७ पर्यंत प्रदर्शित होणार नसल्याने परेश यांचे पैसे जवळजवळ दोन वर्षे रोखले गेले असते. ज्यामुळे त्यांनी चित्रपट सोडल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, परेश आणि त्यांच्या टीमने अद्याप यावर कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. परेश रावल यांनी चित्रपट सोडण्याचे कारण दिग्दर्शकाशी कोणतेही मतभेद नाहीत असं ठामपणे म्हटलं.
परेश रावल व चित्रपटाचे दिग्दर्शक यांच्यामधील वैचारिक मतभेदांमळे त्यांनी हा निर्णय घेतला अशा अनेक अफवांना मध्यंतरी उधाण आलं होतं. परंतु, नंतर परेश यांनी स्वत: एक्सवर पोस्ट करीत या अफवा खोट्या असल्याचं म्हटलं. त्यांनंतर याबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत आपली प्रतिक्रिया दिली.
यावेळी दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी सांगितलं, “अभिनेत्याने इतर टीमसह करारावर स्वाक्षरी केली. आमचे सर्व करार झाले होते. दहा दिवसांपूर्वी सुनील, अक्षय आणि परेश यांनी एक टीझरही शूट केला. आम्ही सर्वसंमतीने ‘हेरा फेरी ३’मध्ये काम करण्यास सहमती दर्शविल्यानंतरच अक्षयने हेरा फेरी ३’चे हक्क विकत घेतले.”