प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. ‘जब वी मेट’ हा त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटांपैकी एक आहे. करीना कपूर व शाहिद कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने अनेकांना वेड लावलं होतं. चित्रपटातील या जोडीचा अभिनय, त्यांच्या भूमिका, गाणी हे सर्वच लक्षवेधी होतं. आजही या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. अशातच नुकतेच इम्तियाज अली यांनी या चित्रपटामुळे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाल्याचं म्हटलं आहे.
इम्तियाज अली यांनी ‘द हॉलीवूड रिपोर्टर इंडिया’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी ‘जब वी मेट’दरम्यान त्यांच्याबरोबर घडलेला एक किस्सा सांगितला आहे. या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, “‘जब वी मेट’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर माझ्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. मी रतलाम या शहराबद्दल चुकीची दृष्ये दाखवली असं म्हणत माझ्याविरोधात ती तक्रार करण्यात आली होती. याची नोटीस चित्रपटाच्या निर्मात्यांच्या कार्यालयामध्ये गेली होती, कारण रतलाम हे शरह चिवडा, फाफडा यांसाठी प्रसिद्ध आहे. पण, मी त्या शहराचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी म्हटलं. कारण त्या शहरातील रेड लाईट एरियातील एक दृष्य चित्रपटात होतं. तक्रार दाखल झाली तेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि मी ‘लव्ह आजकल’ या माझ्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणानिमित्त कोलकातामध्ये होतो.”
इम्तियाज अली याबाबत पुढे म्हणाले, “चित्रपटाचे निर्माते माझ्याकडे आले आणि म्हणाले, तुमच्यासाठी अरेस्ट वॉरेंट आलं आहे. त्यांना जर कळलं की तुम्ही कोलकातामध्ये आहात तर ते तुम्हाला पकडून घेऊन जातील आणि माझं नुकसान होइल. सेटवर काही क्षण सगळे काळजीत होते.” पुढे याबद्दल सांगताना ते म्हणाले, “तेव्हा सेटवर ढिलूजी(चित्रपटाच्या निर्मात्या) होत्या. त्या मला म्हणाल्या, तू घाबरू नको, मी तुझ्यासाठी रोज डब्बा घेऊन येत जाईन.” (इम्तियाज अली हे गमतीत सांगतात)
दरम्यान, इम्तियाज अली यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी आजवर ‘जब वी मेट’, ‘लव्ह आजकल’, ‘रॉकस्टार’, ‘तमाशा’, ‘हायवे’, ‘जब हॅरी मेट सेजल’, ‘सोचा ना था’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे यातील त्यांच्या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे; तर आजही तरुणांमध्ये या चित्रपटाची क्रेझ कायम आहे.