Jiah Khan Tried To Call Sooraj Pancholi:’गजनी’, ‘हाऊसफुल’, ‘निशब्द’, ‘धोबी घाट’, ‘आपका साया’ अशा चित्रपटात जिया खान दिसली होती. मात्र, २०१३ साली अभिनेत्रीने आत्महत्या करत तिचे जीवन संपवले. त्यानंतर सूरज पंचोलीवर आरोप करण्यात आले होते.

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २०२३ मध्ये पुराव्याअभावी सूरजची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, जियाच्या मृत्यूनंतर सूरज पंचोलीला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते. जेव्हा जियाच्या मृत्यू झाला त्यादरम्यान सूरज बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार करणार होता. आता सूरज पंचोलीच्या आईने म्हणजेच अभिनेत्री झरीना वहाब यांनी या सर्व प्रकरणाबाबत वक्तव्य केले आहे.

मी सूरजला सांगितले की सलमान…

सूरज पंचोलीची आई झरीना वहाब यांनी नुकताच नयनदीप रक्षित यांच्याबरोबर संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, “जिया व सूरज जेव्हा मित्र होते, त्याचदरम्यान सलमान सूरजला लॉन्च करणार होता. त्यावेळी मी सूरजला सांगितले की सलमान तुला लॉन्च करणार आहे. हे सगळं बंद कर. तो तिच्याकडे गेला. आपण भेटू नये असे माझ्या पालकांना वाटते, असे त्याने तिला सांगितले. तुझ्या आईलादेखील असेच वाटते. त्यामुळे आपण ब्रेकअप करू.”

“त्यानंतर ती म्हणाली की मी कधीतरी तुला भेटण्यासाठी येऊ शकते का? यावर सूरज तिला म्हणालेला की तू येऊ शकतेस, मला भेटू शकतेस. पण एक मैत्रीण म्हणून भेटू शकतेस. गर्लफ्रेंड म्हणून नाही. त्याचदरम्यान, ती दक्षिणेत तेलुगु चित्रपटाच्या शूटिंगसाठी जाणार होती. मात्र, तिला वेळेवर चित्रपटातून काढून टाकले. त्यामुळे ती नैराश्यात होती.

झरीना वहाब पुढे असेही म्हणाल्या, “जिया खूप नैराश्यात होती. ती सूरजला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती. शूटिंगमुळे सूरजचे काही क्लास सुरू होते. त्याने तिचा फोन उचलला नाही. ज्यावेळी त्याने फोन उचलला, त्यावेळी त्याने तिला मेसेज केला की आता मला वेळ आहे. जर तुला फोन करायचा असेल तर करू शकतेस. मात्र, तोपर्यंत तिचे निधन झाले होते. आता सगळे म्हणतात की सूरजने अमुक अमुक गोष्टी केल्या.पण, हे खूप चुकीचे आहे. ती बिचारी मुलगी खरंच खूप चांगली होती. पण, फक्त देवाला माहित आहे की तिच्याबाबत नेमकं काय घडलं.”

“जेव्हा जियाने सूरजला सांगितले होते की ती दक्षिणेत काम करण्यास जाणार आहे, तेव्हा त्याने तिच्यासाठी फुलांचा गुच्छ पाठवला होता. जे काही झालं ते वाईट होतं. पण, लोकांना गैरसमज झाला. तुम्ही किती लोकांजवळ जाऊन स्पष्टीकरण देणार आहात? पण, सूरजने खूप सहन केले आहे.”

सूरजच्या कामाबाबत बोलायचे तर लवकरच तो ‘केसरी वीर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात विवेक ओबेरॉय आणि सुनिल शेट्टी प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत. हा चित्रपट २३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.