प्रसिद्ध अभिनेत्री काजोल ही १९९० च्या काळातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आजवर तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या त्याकाळी गाजलेल्या चित्रपटांची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये आहे. अशातच अभिनेत्रीने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. यामध्ये तिने प्रेक्षकांना असलेल्या तिच्या ‘दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘कुछ कुछ होता है’ यांसारख्या चित्रपटांच्या सिक्वेलच्या अपेक्षांबद्दल सांगितलं आहे.

‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये काजोल म्हणाली, “लोक म्हणतात, तुम्ही ‘कुछ कुछ होता है २’ हा चित्रपट केला पाहिजे, ज्यामध्ये तुम्ही पुन्हा शाहरुख खानच्या प्रेमात असाल वगैरे असं काहीसं पाहायला मिळेल. मुद्दा हा आहे की ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट हिट ठरला, कारण त्यामध्ये वेगळे लोक होते, वेगळं जग होतं. आपल्याकडे आजही अशी लोकं आहेत, ज्यांना त्या प्रकारच्या प्रेमावर विश्वास असतो, जे आयुष्यात एकदाच होतं. पण, जर तुम्ही आताच्या काळातील कोणाला विचारलं तर ते म्हणतील, जर हे नातं नाही टिकलं तर आमच्याकडे दहा वेगळे पर्याय आहते. त्यामुळे आताच्या काळात त्या प्रकारच्या कथेला किती प्रतिसाद मिळेल हे सांगणं अवघड आहे.”

काजोल पुढे ‘दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाबद्दल म्हणाली, तिला या चित्रपटाचा सिक्वेल बघायला आवडणार नाही. काजोल म्हणाली, “मला ‘दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे २’ याबद्दल कल्पनाही करवत नाही. ट्रेनच्या त्या सीननंतर काय झालं हे जाणून घेण्यात कोणालाही रस नाही, त्यामुळे त्या चित्रपटाचा जो शेवट आहे तोच छान आहे. त्या सीननंतर द एंड असं लिहिलेलं येतं आणि पुढे काय झालं ते प्रेक्षकांना त्यांच्या त्यांच्या कल्पनाशक्तीनुसार ठरवू देत.” पुढे काजोल चित्रपटसृष्टीतील तिच्या कारकिर्दीबद्दल बोलताना म्हणाली, तिने तिच्या ३४ वर्षांच्या कारकिर्दीत मोजकेच चित्रपट केले असल्याने तिला तिने काम केलेल्या एकाही चित्रपटाबद्दल पश्चाताप वाटत नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काजोलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच ‘माँ’ या तिच्या आगामी चित्रपटातून झळकणार आहे. यामध्ये ती मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तिचा नवरा अभिनेता अजय देवगणने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. २७ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.