विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेला ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्च २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तीन वर्षांनंतरही या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. चित्रपटच्या प्रदर्शनानंतर काही प्रेक्षकांनी या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं, तर काहींच्या मते हा एक विशिष्ट प्रोपगंडा (प्रचारकी) करणारा चित्रपट होता.
प्रेक्षकांबरोबरच काही कलाकारांनीदेखील या चित्रपटाबद्दल समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न, मुस्लिम समाजाबद्दल द्वेष निर्माण करणारा चित्रपट असल्याची टीका केली होती. अशातच या टीकाकारांना विवेक अग्निहोत्री यांच्या पत्नी व अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी थेट उत्तर दिलं आहे. पल्लवी जोशींनी नुकताच ‘आरपार’शी संवाद साधला.
या संवादात त्यांनी ‘काश्मीर फाइल्स’ला प्रचारकी चित्रपट बोलणाऱ्यांबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्या असं म्हणाल्या, “आमच्या चित्रपटाला प्रोपगंडा (प्रचारकी) चित्रपट म्हणणारे खूप असेही लोक होते, जे राजकीयदृष्ट्या प्रेरित होते. त्या लोकांचं ऐकून सामान्य प्रेक्षकसुद्धा बोलायला लागले. पण जे लोक असं बोलत होते, त्यांना आता वस्तूस्थिती कळली ना?”
यापुढे त्या म्हणाल्या, “आम्ही फक्त काश्मिरी पंडितांबद्दल त्या चित्रपटात बोललो होतो. आम्ही त्यांच्या त्रासाबद्दल बोललो होतो. त्यांच्याशी आम्हाला काय घेणं-देणं असे म्हणणारे लोक होते. हा चित्रपट आणण्याचा उद्देशच हा होता, की ही काश्मीरची गोष्ट नाही तर ही आपल्या भारताची गोष्ट आहे. काश्मीरला तुम्ही वेगळं नका समजू.”
यानंतर पल्लवी जोशींनी सांगितलं, “काश्मीर खूप लांब आहे आणि तिकडे जाण्यासाठी दोन विमानांचा प्रवास करावा लागतो; म्हणून याचा अर्थ असा नाही की, त्यांची काहीतरी वेगळी ओळख आहे किंवा त्यांचं वेगळं अस्तित्व आहे. तसं पाकिस्तानचं म्हणणं आहे. ते आपलं नाही. काश्मीर आपलाच प्रदेश आहे आणि त्याची झळ आपल्या कधी ना कधी लागणारच आहे.”
यापुढे पल्लवी जोशी म्हणाल्या, “आम्ही या चित्रपटातून हेच सांगायचा प्रयत्न केला. त्यानंतर आज कर्नाटक, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि डोंबिवलीमधील लोकांच्या जीवावर बेतलं, तेव्हा तरी लोकांना कळेल की नाही की वस्तूस्थिती काय आहे. के अजूनही तुम्ही हेच म्हणणार की, तुम्ही प्रचारकी चित्रपट बनवत आहात.”
दरम्यान, संमिश्र प्रतिसादानंतरही ‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली. अंदाजे २० कोटी रुपये खर्च करून बनवलेल्या या चित्रपटाने २५२.२५ कोटी रुपयांचा निव्वळ गल्ला जमवला. चित्रपटाची जगभरातील कमाई ३४१ कोटी रुपये होती. हा चित्रपट एका महिन्यापेक्षा जास्त काळ चित्रपटगृहांमध्ये चालला होता.