प्रकाश राज हे दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील मोठं नाव. आजवर त्यांनी त्यांच्या सहज अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांसह त्यांनी हिंदीतही काम करीत त्यांच्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्यांनी साकारलेल्या बऱ्याच भूमिका प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहेत. महत्त्वाचं म्हणजे फक्त भूमिकाच नव्हे, तर त्यांचे संवादही प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत.

‘सिंघम’ चित्रपटातील ‘सो गया तो मारेंगे’, या त्यांच्या संवादावर मिम्सही बनवले गेल्याचे पाहायला मिळतात. ‘सिंघम’ या चित्रपटासह त्यांनी ‘खाकी’, ‘वॉन्टेड’, ‘दबंग २’, ‘मुंबई मिरर’ यांसारख्या काही हिंदी चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. परंतु, ‘सिंघम’मधील त्यांच्या भूमिकेनं विशेष लक्ष वेधलं.

अशातच नुकतीच त्यांनी ‘लल्लनटॉप’ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये प्रकाश राज यांनी त्यांच्या हिंदीत काम करण्याबद्दलचा एक गमतीशीर प्रसंग सांगितला आहे. यावेळी ते किस्सा सांगत म्हणाले, “सिंघम या चित्रपटात काम केल्यानंतर एका पत्रकारानं मला हिंदीत काम करण्याचा अनुभव कसा होता, असा प्रश्न विचारला. त्यावर मी त्याला म्हणालो, एअरवेनं (विमान) गेलो होतो. कारण हिंदीत किंवा बॉलीवूडमध्ये काम केल्याचं मला काही नवल नाही. इथे काम करणं हे माझं स्वप्न नव्हतं. मला ‘सिंघम’मधील भूमिकेसाठी विचारणा झाली आणि मी ती भूमिका केली इतकंच… अभिनय करणं हे माझं काम आहे आणि मी फक्त तेच केलं.”

याबाबत बोलताना पुढे ते म्हणाले, “त्याने पुन्हा मला; पण तरी ‘सिंघम’नंतर तुम्ही मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचलात तुम्ही खूप ताकदीचे कलाकार वाटत आहात, असं म्हटलं . यावर मी आधीपासून असाच आहे; फक्त तुम्ही आता पाहिलंत, असं उत्तर दिलं”.

यासह प्रकाश राज यांनी या मुलाखतीमध्ये ‘सिंघम’ चित्रपटातील त्यांच्या गाजलेल्या संवादाबद्दलचा किस्सा सांगितला आहे. ते म्हणाले, “सिंघम या चित्रपटातील ‘सो गया तो मारेंगे’ हा संवाद खरं तर स्क्रिप्टमध्ये नव्हता; पण मला या भूमिकेसाठी काहीतरी वेगळं करायचं होतं. आणि तेव्हा काय वेगळं करता येईल या विचारात असताना माझ्या पद्धतीनं मी तो संवाद घेतला होता. तेव्हा मला माहीत नव्हतं की, लोकांना तो इतका आवडेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रकाश राज हे अभिनयासह त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. सामाजिक आणि राजकीय विषयांवर ते बेधडकपणे वक्तव्य करीत असतात. प्रसंगी सरकारवर टीकाही करतात. तर लवकरच ते ‘इडली कडई’ या आगामी तमीळ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा चित्रपट दाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिग्दर्शित केला आहे. या वर्षातील ऑक्टोबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.