येत्या शुक्रवारी आयुष्मान खुरानाचा ‘डॉक्टर जी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाद्वारे देशभरातील पुरुष स्त्रीरोगतज्ञांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. त्याच्या व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये रकुल प्रीत सिंह, शैफाली शहा आणि शीबा चड्ढा हे कलाकार दिसणार आहेत. आयुष्मान खुरानाचे मागील दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी झाल्याने त्याच्या चाहत्यांना या चित्रपटाकडून फार अपेक्षा आहेत. चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या प्रमोशन करण्यामध्ये व्यग्र आहे.
ऑगस्ट महिन्यामध्ये बॉलिवूडमध्ये नकारात्मक वातावरण निर्माण झाली होते. सर्वत्र बॉयकॉट बॉलिवूडचे वारे वाहत होते. याचा फटका ‘लाल सिंह चड्ढा’ आणि ‘रक्षाबंधन’ अशा बिगबजेट चित्रपटांना बसला. सध्या बॉलिवूडच्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाचे प्रमाण कमी झाले आहे. या सर्व परिस्थितीवर अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने भाष्य केले आहे. “समाजासाठी अयोग्य असणाऱ्या गोष्टींवर बहिष्कार करायला हवा. पण त्याआधी संबंधित विषयावर चर्चा व्हायला हवी. चर्चा न करता फक्त एका मुद्दयाच्या आधारावर चित्रपटांना बॉयकॉट करणं चुकीचे आहे. त्याच्या परिणाम कलाकारांसह संपूर्ण इंडस्ट्रीवर होत असतो”, असे तिने सांगितले.
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने हिंदी चित्रपटांना प्रेक्षक कमी प्रतिसाद देत असल्याची कबूली दिली आणि त्यामागील कारण स्पष्ट केले. ती म्हणाली, “सर्वांनी हा कठीण काळ अनुभवला आहे. लोक सध्या त्यांच्या जीवनाची घडी बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मनोरंजनाचे माध्यम बदलले आहे. दोन वर्ष चित्रपटगृह बंद असल्यामुळे आता दर आठवड्याला बरेचसे नवीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. ते प्रत्येक शुक्रवारी चित्रपट पाहायला जाऊ शकत नाही ना…”
आणखी वाचा – मी भूमिका साकारावी ही छत्रपती शिवरायांची इच्छा होती : सुबोध भावे
‘डॉक्टर जी’मध्ये रकुल प्रीत सिंहने फातिमा हे पात्र साकारले आहे. या चित्रपटानंतर तिचा ‘थँक गॉड’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. २०२२ मध्ये तिचे ‘अटॅक’, ‘रनवे ३४’, ‘कटपुतली’ असे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.तसेच ती ‘इंडियन २’ या बहुचर्चित चित्रपटामध्ये दिसणार आहे.