दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘आदिपुरुष’ सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. तेव्हापासून सोशल मीडियावरून या चित्रपटावर टीका होताना दिसत आहे. अनेक राजकीय नेते, अभिनेते तसेच सोशल मीडिया युजर्सनीही यावर आपल्या प्रतिक्रिया देत चित्रपटाला विरोध केला आहे. अशातच आता ‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेची निर्मिती करणारे रामानंद सागर यांचा मुलगा प्रेम सागर यांनी यावर आपलं मत स्पष्ट केलंय.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रेम सागर यांनी ‘आदिपुरुष’ चित्रपटाबाबत आपले विचार मांडले. या मुलाखतीत ते म्हणाले, “तुम्ही कोणालाच काही बनवण्यापासून थांबवू शकत नाही. काळानुसार धर्म बदलतो. चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना जे ठीक वाटलं ते त्यांनी केलं.” पण या मुलाखतीत प्रेम सागर यांनी चित्रपटाची बाजू घेण्यास नकार दिला आणि ओम राऊतने या चित्रपटाला रामायण म्हटलेलं नाही असंही सांगितलं. याशिवाय त्यांना असा एखादा प्रोजेक्ट मिळाला असता तर त्यांनी तो कधीच केला नसता कारण त्यांच्यावर तसे संस्कार नाही ना ती त्यांची संस्कृती असं त्यांनी या मुलाखतीत सांगितलं.
आणखी वाचा-अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’बाबत ‘आदिपुरुष’च्या दिग्दर्शकाचं मोठं वक्तव्य, म्हणाला “मी रामभक्त…”

दरम्यान प्रेम सागर हे छोट्या पडद्यावर प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ‘अलिफ लैला’, ‘विक्रम वेताळ’ अशा काही लोकप्रिय टीव्ही मालिकांची निर्मिती केली होती. याशिवाय ‘बसेरा’ आणि ‘आरजू है तू’ या त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत. ‘आदिपुरुष’बाबत टीव्हीवरील राम अर्थात अभिनेते अरुण गोविल यांनीही प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी या टीझरवर नाराजी व्यक्त केली होती.

आणखी वाचा-‘आदिपुरुष’मधील रावणाच्या लूकवरुन होणाऱ्या टीकेला ओम राऊत यांचं चोख उत्तर; म्हणाले “आमचा रावण हा..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अरुण गोविल यांनी त्यांच्या युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर करत चित्रपटाच्या टीझरबाबत आपलं मत मांडलं होतं. “आपली संस्कृती आणि धार्मिक वारसा यांचा अशाप्रकारे खेळ मांडणं चांगलं नाही. संस्कृतीची मोडतोड करून मांडणं अतिशय चुकीचं आहे.” असं त्यांनी आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. याशिवाय, सुनील लहरी, पुनीत इस्सर, मुकेश खन्ना, दीपिका चिखलिया यांनीही या टीझरवर मत मांडताना नाराजी व्यक्त केली होती.