Smita Patil Had Intuition About Her Health: स्मिता पाटील यांनी त्यांच्या अभिनयाने मराठीसह बॉलीवूडमधील अनेक चित्रपट अजरामर केले. आजही त्यांच्या अभिनयाबद्दल बोलले जाते. स्मिता पाटील यांनी ‘आज की आवाज’, ‘मंथन’, ‘भूमिका’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांच्या अभिनयाची छाप सोडली.
दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक स्मिता पाटील हा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. त्याने विविध मुलाखतींमध्ये केलेली वक्तव्ये लक्षवेधी ठरत आहेत. प्रतीक व त्याचे वडील राज बब्बर यांच्यातील दुरावा सध्या चर्चेचे कारण ठरत आहे.
“स्मिता पाटील यांची प्रकृती नाजूक…”
आता या सगळ्यात ज्येष्ठ पत्रकार भावना सोमय्या यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्मिता पाटील यांना त्यांच्या प्रकृतीबद्दल सतत चिंता असे, त्यांना त्यांच्या आरोग्याबद्दल सतत काळजी वाटत होती, असे वक्तव्य केले आहे. स्मिता पाटील यांच्याबद्दल भावना सोमय्या नेमकं काय म्हणाल्या, हे जाणून घेऊ…
भावना सोमय्या यांनी नुकतीच ‘सीएनएन-न्यूज १८’ ला मुलाखत दिली. या मुलाखतीत स्मिता पाटील यांच्याबाबत त्या म्हणाल्या, “स्मिता पाटील यांची प्रकृती नाजूक होती. त्यांच्यासाठी त्यांचे आरोग्य ही एक समस्या होती, त्यामुळे त्यांना त्यांच्या बाळाबरोबर वेळ घालवायचा होता. कदाचित असे असू शकते की, त्यांना त्यांच्या प्रकृतीबद्दल अंर्तज्ञान झाले असावे, कारण बाळाच्या जन्मानंतर अल्पावधीतच त्यांचे निधन झाले.”
भावना सोमय्या पुढे म्हणाल्या, “जेव्हा स्मिता पाटील यांची प्रकृती बिघडली आहे हे मला समजले तेव्हा मी एका कार्यक्रमात होते. मी घरी पोहोचले तेव्हा मला माहिती मिळाली की स्मिता यांना रुग्णालयात दाखल केले आहे. मी रुग्णालयात पोहोचेपर्यंत मला सांगण्यात आले होते की स्मिता पाटील आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर आहेत.”
स्मिता पाटील व राज बब्बर यांनी १० डिसेंबर १९८१ साली लग्नगाठ बांधली. २८ नोव्हेंबर १९८६ ला त्यांना मुलगा झाला, त्याचे प्रतीक असे नाव आहे. बाळाच्या जन्मानंतर काही दिवसांतच स्मिता पाटील यांचे निधन झाले. १३ डिसेंबर १९८६ साली त्यांचे निधन झाले.
प्रतीकने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, मला अलीकडेच हे समजले आहे की आईच्या निधनानंतर माझी कस्टडी घेण्यासाठी वडिलांचे कुटुंब आणि आईचे कुटुंब यांच्यात कायदेशीर लढाई सुरू होती. यामध्ये माझ्या आईच्या आई-वडिलांना यश मिळाले. याबरोबरच त्याने असेही म्हटले की, जावेद अख्तर व शबाना आझमी हे मला दत्तक घेण्यास इच्छुक होते.
दरम्यान, प्रतीकने २००८ साली ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे.