अभिनेता वरुण धवनसाठी २०२२ हे वर्ष काही फार खास ठरलं नाही. यावर्षी त्याने मनोरंजन सृष्टीतील कारकिर्दीची दहा वर्षे पूर्ण केली. पण २०२२मध्ये प्रदर्शित झालेले त्याचे दोन्हीही चित्रपट उत्कृष्ट कमाई करू शकले नाहीत. त्यामुळे वरुण धवन या चित्रपटांमुळे निराश आहे. नुकतीच एका मुलाखतीत ही निराशा व्यक्त करत त्याने त्याच्या करिअर संबंधित विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावर्षी वरुण धवनची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला 'जुग जुग जिओ' आणि 'भेडिया' असे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. 'जुग जुग जियो' या चित्रपटात वरुण, कियारा अडवाणी, नीतू कपूर आणि अनिल कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. तर दुसरीकडे 'भेडिया' या चित्रपटात त्याने क्रिती सेनॉनबरोबर स्क्रीन शेअर केला. २०२० सालच्या लॉकडाऊनपासूनच त्याचा कठीण काळ सुरू झाला असं त्याने नुकतच एका मुलाखतीत सांगितलं. आणखी वाचा : “जीना नहीं है फिर भी…” नवाजुद्दीन सिद्दीकीची ‘ती’ पोस्ट चर्चेत वरुणने नुकतीच 'मिड डे'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याच्या करिअरबद्दल बोलताना तो म्हणाला, "२०२० पासून ते आत्तापर्यंत मला अनेक कठीण प्रसंगातून जावं लागलं. लॉकडाऊन मुळे आमचा 'कुली नंबर 1' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला. आपण क्रिएटिव्ह चित्रपट केले पाहिजेत असं मला वाटलं. फक्त माझ्या तारखा उपलब्ध आहेत म्हणून मी चित्रपट करतोय असं कोणालाही वाटता कामा नये. हा विचार करून मी 'जुग जुग जियो आणि 'भेडिया' हे दोन चित्रपट यावर्षी केले. हे दोन्ही चित्रपट आणि 'बवाल' हा चित्रपट साईन करण्यासाठी मला खूप वाट पहावी लागली." हेही वाचा : कार्तिक आर्यनच्या आधी वरुण धवनला झाली होती ‘हेरा फेरी ३’ची विचारणा, पण ‘या’ कारणामुळे अभिनेत्याने नाकारली ऑफर पुढे तो म्हणाला, "चित्रपटांच्या बाबतीत २०२२ हे वर्ष माझ्यासाठी निराशाजनक होतं. 'भेडिया'च्या निमित्ताने प्रेक्षक पुन्हा एकदा मोठ्या संख्येने चित्रपटगृहाकडे वळतील अशी मला आशा होती. आमचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'भेडिया' उत्कृष्ट कामगिरी करेल असं आम्हाला वाटत होतं, पण तसं काही झालं नाही. आमच्या अपेक्षेपेक्षा या चित्रपटाची कमाई कमी झाली. पण इतर चित्रपटांच्या तुलनेत 'भेडिया' त्या शर्यतीत थोडा पुढेच होता या गोष्टीचं मला समाधान आहे."