अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालंय. दोघेही एकमेकांबरोबर खूप आनंदी आहेत. त्यांची क्यूट जोडी प्रेक्षकांनाही खूप आवडते. दोघेही एकमेकांच्या चित्रपटांच्या स्क्रिनिंगला देखील हजर असतात. अनेक मुलाखतींमध्ये ते त्याच्या नात्याबद्दल आणि एकमेकांवरील प्रेमाबद्दल बोलताना दिसतात.

विकी सध्या ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यावेळी आपण निष्ठावंत असल्याचं विकीने सांगितलं. तसेच चित्रपटातील त्याच्या भूमिकेसारख्या परिस्थितीत तो कधीच अडकणार नाही, असंही तो म्हणाला. “मी निष्ठेवर विश्वास ठेवतो. केवळ रोमँटिक नात्यातच नव्हे तर कोणत्याही नात्यात निष्ठा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. किंबहुना तोच कोणत्याही नात्याचा असतो. मग ती मैत्री असो, प्रेम असो, भाऊ, बहीण, आई, वडील किंवा इतर कोणतंही नातं असतो, असं माझं वैयक्तिक मत आहे,” असं विकी ‘फिल्मफेअर’शी बोलताना म्हणाला.

विक्कीने त्याच्या लग्नाला सुंदर आणि त्याच्या आयुष्यातील सर्वात चांगला चॅप्टर म्हटलंय. “आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घेणारा जोडीदार आयुष्यभरासाठी मिळणे, ही सर्वात अद्भुत भावना आहे. कारण, तीच गोष्ट तुम्हाला शांत आणि आनंदी ठेवते, तुमच्या मनात काय प्रेमाची भावना असते आणि जेव्हा तुम्हाला प्रेम वाटतं, तेव्हा तुम्हाला फक्त घरातच नाही तर घराबाहेरही प्रेमळ राहावसं वाटतं. हे दुसरं तिसरं काही नसून आपलंच सर्वोत्तम व्हर्जन बाहेर आणणं होय,” असं विकीने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विकीने कतरिनाशी लग्न करण्याच्या निर्णयाबद्दल त्याच्या पालकांना सांगितलं, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती, याबद्दलही सांगितलं. “माझे आई-बाबा खूप आनंदी होते. ते तिच्यावर खूप प्रेम करतात. मला वाटते जेव्हा तुमचं मन चांगलं असेल, तर तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत आणि तुमच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीत त्याचं प्रतिबिंब दिसतं,” असं विकीने सांगितलं. यावेळी विकीने कतरिनाचं खूप कौतुक केलं आणि ती कायम सकारात्मक विचार करते, असंही तो म्हणाला.