Vinod Khanna : अभिनेता विनोद खन्ना म्हणजे बॉलिवूडचा हँडसम हंक. हिंदी चित्रपटसृष्टीतला एक काळ त्याने त्याच्या दिसण्याने आणि पडद्यावरच्या असण्याने घालवला असा नायक म्हणजे विनोद खन्ना. अमिताभ बच्चन यांनाही विनोद खन्नाबाबत एक सूप्त असूया असायची असे किस्से सांगितले जायचे. विनोद खन्ना यांचं आठ वर्षापूर्वी निधन झालं आहे. मात्र दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या स्मरणात विनोद खन्ना आहेत. विनोद खन्ना महेश भट्ट यांची चांगली मैत्री होती. अभिनेता विनोद खन्नाने एकाहून एक असे सरस चित्रपट दिले आहेत. मात्र चित्रपटसृष्टीची कारकीर्द भरात असताना त्याने रजनीश आश्रमात जाण्याचा मार्ग स्वीकारला. त्यानंतर त्याने कमबॅकही केलं. पण तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. महेश भट्ट यांनी याच आठवणी ताज्या केल्या आहेत.
अमिताभला विनोद खन्नांमुळे कॉम्प्लेक्स
अमिताभला विनोद खन्नामुळे अनेकदा असुरक्षितता वाटत असे. त्यामुळे या दोघांनी फार फिल्म एकमेकांसोबत केल्या नाहीत. अमर अकबर अँथनी, परवरीश, हात की सफाई, मुकद्दर का सिकंदर हे चित्रपट अमिताभ आणि विनोद खन्ना यांनी सोबत केले… मात्र दरवेळी अमिताभ विनोद खन्ना समोर असेल तर त्याचा रोल चेक करत असे असे किस्से सांगितले जात. अनेकदा त्याचे सीन कट करण्याचीही अट ठेवत असे असंही सांगितलं जातं.
महेश भट्ट काय म्हणाले?
“विनोद खन्नाला आपल्यातून जाऊन आठ वर्षे झाली. पण समुद्राचं पाणी खळाळावं तसा तो माझ्या आठवणींत आजही आहे. त्याचं नाव कुणीही घेतलं तरीही त्याच्या भोवतीच्या आठवणींचे गोफ माझ्याभोवती फेर धरतात. विनोद खन्ना गेला, तेव्हा एक सूर्य अस्ताला गेल्यानंतर जे आपल्याला वाटतं किंवा तारे अस्ताला गेल्यानंतर जे वाटतं तशीच भावना आजही माझ्या मनात आहे. विनोद त्याचं आयुष्य बिनधास्त आणि हरफन मौलाप्रमाणे जगला. तो एक उत्तम अभिनेता होता. त्याच्या अनेक आठवणी आजही माझ्या मनात ताज्या आहेत.” असं महेश भट्ट यांनी सांगितलं.
इन्सान अपना कर्ज चुकाता है एहसान नहीं
महेश भट्ट पुढे म्हणाले, “माझा एक मित्र मला एकदा म्हणाला होता इन्सान अपने कर्ज चुकाता है एहसान नहीं. विनोदच्या बाबतीत मला हेच वाटतं. तो माझा खूप चांगला मित्र होता. तो माझ्या आयुष्याचा एक भाग झाला होता इतके आम्ही जवळचे आणि घट्ट मित्र झालो होतो. त्याच्या अखेरच्या दिवसात मी त्याच्या डोळ्यांत पाहू शकलो नाही आणि त्याचा हातात हात घेऊ शकलो नाही याचं मला वाईट वाटतं. “
विनोद खन्ना आणि महेश भट्ट घट्ट मित्र
महेश भट्ट यांनी सांगितल्याप्रमाणे विनोद खन्नांची चित्रपट कारकीर्द त्यांच्याच लहू के दो रंग नावाच्या सिनेमापासून सुरु झाली होती. मात्र आयुष्यात अशीही वेळ येतेच की वेगळं व्हावं लागतं. महेश भट्ट आणि विनोद खन्नाही मग वेगळे झाले होते. विनोद खन्ना यांची आई वारल्यानंतर त्या घटनेने त्यांच्या मनावर गहिरा परिणाम केला.
विनोद खन्ना ओशो आश्रमात
विनोद खन्ना त्यानंतर रजनीश ओशो आश्रमात गेले. तो तिकडे एखाद्या संन्यासारखाच राहू लागला होता. तिथल्या वातावरणाने त्याच्या मनावर गहिरा परिणाम केला होता अशीही आठवण महेश भट्ट यांनी Screen ला सांगितली. मी आणि विनोद आम्ही दोघंही ओशो आश्रमात गेलो होतो. पण मी फार काळ तिथे राहू शकलो नाही. विनोद मागे थांबला आणि ओरेगॉनला निघून गेला. त्याला परत आणण्यासाठी आपण अमेरिकेला गेलो होतो पण तो तेव्हा फार फार दूर निघून गेला होता. जणू काही त्याचं ऐहिकातून मन उडालं होतं. रजनीश यांचं रजनीशपुरम उद्ध्वस्त झाल्यानंतर विनोदही मनातून कोसळला होता. त्यानंतर जसलोक रुग्णालयासमोरच्या एका छोट्या फ्लॅटमध्ये आम्ही पुन्हा भेटलो होतो अशीही आठवण महेश भट्ट यांनी सांगितली.

विनोद खन्ना आणि महेश भट्ट यांची पुन्हा भेट झाल्यावर काय घडलं होतं?
महेश भट्ट यांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा विनोद आणि ते पुन्हा भेटले तेव्हा भरपूर दारु प्यायले. पण त्यावेळी महेश भट्ट यांना जाणवलं होतं की विनोद खन्ना आता पूर्वीसारखा विनोद खन्ना राहिला नाही. विनोद खन्ना यांनी चित्रपटसृष्टीतली नवी इनिंग सुरु केली खरी पण त्यांना पूर्वीची उंची गाठता आली नाही. त्यानंतर विनोद खन्ना राजकारणातही गेले पण तिथेही बात कुछ जमी नहीं. मद्यपान केलं की त्याचा आवाज कमालीचा मृदू होत असे. काळाने म्हणा, नियतीने म्हणा, नशिबाने म्हणा विनोद खन्ना यांना जी किंमत चुकवावी लागणार होती ती चुकवावी लागलीच. पण विनोद खन्ना आणि महेश भट्ट यांच्यातल्या मैत्रीची वीण ते परतल्यानंतर सैल झाली नाही.
विनोद खन्ना १९७५ ला ओशो आश्रमात गेले
विनोद खन्ना त्यांचं करिअर एका खास उंचीवर असताना रजनीश ओशो आश्रमात निघून गेले. तिथे ते एका संन्यासीप्रमाणे जगू लागले. कधी कधी ते त्यांच्या चित्रपटांचं शुटिंगही पुण्यात ठेवत. पण नंतर नंतर असं घडू लागलं की ओशोंना ते जास्त वेळ देऊ लागले. १९७५ मध्ये विनोद खन्ना यांनी ओशोंसह अमेरिका गाठली. त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या कार, संपत्ती हे सगळं त्यांनी गरिबांना दान करुन टाकलं. ३१ डिसेंबर १९७५ ला विनोद खन्ना यांनी ओशोंची दिक्षा घेतली. ओशो आश्रमात ते माळी म्हणून बागकाम करत. तिथे त्यांनी भांडी घासणं, स्वच्छतागृहांची सफाई अशीही कामं केलं. चार वर्षे ते आश्रमात राहिले होतो. अमेरिकेतला आश्रम ओशोंना बंद करावा लागला तेव्हा भारतात परतले. पण तोपर्यंत त्यांचं कुटुंब विखुरलं होतं. त्यांच्या पहिल्या पत्नीने गीतांजलीने त्यांना घटस्फोट दिला. त्यानंतर १९८७ मध्ये इन्साफ नावाच्या सिनेमातून विनोद खन्ना यांनी कमबॅक केलं. पण पूर्वीप्रमाणे ते करिअरच्या तो आलेख पुन्हा गाठू शकले नाहीत. त्यांना शेवटच्या दिवसांमध्ये कर्करोगाने ग्रासलं होतं. २०१७ मध्ये त्यांचं निधन झालं.

सिंहाच्या काळजाचा माणूस म्हणजे विनोद खन्ना-महेश भट्ट
एक दिवस असाच आठवतो, मला एका सिनेपत्रकाराचा फोन आला. त्याने सांगितलं विनोद खन्ना जगातून निघून गेले. काळजावर कुणीतरी भलामोठा दगड ठेवला आहे असं वाटलं. विनोद खन्ना यांच्या निधनाच्या बातमीने महेश भट्ट यांच्या मनावर परिणाम केला. ते म्हणतात विनोद जाऊन आठ वर्षे झाली आहेत. पण आजही त्याच्यासाठी वाजलेल्या टाळ्या, शिट्ट्या, त्याला मिळालेली अपार प्रसिद्धी यापेक्षा मला आठवतं ते त्याचं मंद स्मित आणि मौन.. आणि एखाद्या सिंहासारखं त्याचं औदार्य. विनोद खन्ना यांनी आपलं आयुष्य बदलून टाकलं. ते नसते तर आज आपण जे आहोत ते नसतो असंही महेश भट्ट यांनी सांगितलं.