दीपिका पादुकोणने ‘छपाक’ चित्रपटात मुख्य भूमिका केली होती. पाच वर्षांपूर्वी या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ती जेएनयूमध्ये (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ) गेली आणि तिथल्या आंदोलनात सहभागी झाली होती. दीपिकाच्या जेएनयू भेटीबद्दल आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी टिप्पणी केली आहे.
दीपिकाला माहित असतं की ती नक्की काय करतेय, तर कदाचित ती गेली नसती असं विवेक अग्निहोत्री म्हणाले आहेत. त्यावेळी जेएनयूमध्ये चेहरे लपवून आलेल्या काही लोकांनी कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला केला होता, या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात दीपिका सहभागी झाली होती. यानंतर दीपिकावर टीका झाली होती आणि तिचा ‘छपाक’ चित्रपट फ्लॉप ठरला होता.
…तर दीपिका कधीच गेली नसती – विवेक अग्निहोत्री
शुभंकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्री म्हणाले, “मी खात्रीने सांगू शकतो की दीपिका जेएनयूमध्ये गेली, तेव्हा तिला तिथल्या राजकारणाबद्दल काहीच माहित नव्हतं.” दीपिका मूर्ख आहे, असं म्हणायचा तुम्ही प्रयत्न करताय का? विचारल्यावर विवेक म्हणाले, “हे मूर्ख असण्याबद्दल नाही. तिच्या पीआरने तिला सांगितलं असेल की ही चित्रपट प्रमोट करण्याची चांगली संधी आहे. पण दीपिकाला जर माहित असतं की हा किती संवेदनशील विषय आहे, तर ती कधीच गेली नसती.” इतक्या वर्षांनीही दीपिकावर या कृतीबद्दल टीका होते, त्यावर विवेक म्हणाले की आगीत हात टाकाल, तर तुम्ही भाजल्याशिवाय राहणार नाही.
दीपिका पादुकोण खूप समजूतदार आहे – विवेक अग्निहोत्री
दीपिका खूप समजूतदार आहे, असं म्हणत विवेक अग्निहोत्रींनी तिचं कौतुक केलं. विवेक म्हणाले, “मी तिला वैयक्तिकरित्या ओळखत नाही, त्यामुळे तिची विचारसरणी काय आहे हे मी सांगू शकत नाही. पण मला हे माहित आहे की ती एक अतिशय समजूतदार आणि बुद्धिमान महिला आहे. जर तिला माहित असतं की ही राजकीयदृष्ट्या संवेदनशील जागा आहे आणि तिचा तिच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो, तर ती कधीही तिथे गेली नसती. चित्रपट प्रमोशन दरम्यान बरेच लोक बऱ्याच गोष्टी बोलत असतात. काय करावं, कोणाशी बोलावं? हे स्टार्सना सागंत असतात. पण ही तिच्या पीआरची चूक होती, त्यांना वाटलं की ही एक घटना आहे. पण ती घटना नव्हती. राजकीय विषयात पडल्याने आतापर्यंत अनेक मोठे लोकही अडकले आहेत.”
दीपिका पादुकोण शेवटची मेघना गुलजार दिग्दर्शित ‘छपाक’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती. तेव्हापासून, तिने अनेक बिग बजेट चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत.
दोन वर्षांपूर्वी इंडियन एक्सप्रेस अड्डामध्ये दिग्दर्शिका मेघना गुलजारने या प्रसंगावर प्रतिक्रिया दिली होती. “मला वाटतं की दीपिका जेएनयूमध्ये गेली, त्याचा चित्रपटाला फटका बसला हे स्पष्ट आहे. चित्रपटाचे नुकसान झाले कारण मला अॅसिड हल्ल्यांवर चर्चा घडवून आणायची होती, पण घडलं वेगळंच. दीपिकाच्या जेएनयू भेटीचा चित्रपटावर नकारात्मक परिणाम झाला. याबद्दल कोणतेही दुमत नाही,” असं मेघना गुलजार म्हणाली होती.