Javed Akhtar vs Sadhguru Jaggi Vasudev : अनेक वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सदगुरू जग्गी वासुदेव आणि लेखक-गीतकार जावेद अख्तर यांच्यात मानवी तर्क, श्रद्धा व विश्वास जोरदार वादविवाद झाला होता. सद्गुरूंनी जावेद अख्तर मेंदू वापरत नसल्याचं म्हटलं होतं. तर, दुसरीकडे सद्गुरूंसारखे लोक निष्पाप लोकांबरोबर धोकादायक खेळ खेळतात, असा आरोप केला होता. श्रद्धा आणि विश्वास याबद्दल बोलताना जावेद अख्तर म्हणाले होते की ते आजवर कधीच अशा आध्यात्मिक गुरूला भेटले नाहीत ज्याला ते गांभीर्याने घेऊ शकतील.

“अध्यात्मवादी लोक सर्वात आधी तुमच्या या पाच इंद्रियांवरचा तुमचा विश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न करतात, कारण असं करूनच ते तुमच्यावर नियंत्रण ठेवू शकतात. यामुळे तुम्ही तुमचं डोकं वापरू शकत नाही आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास कमी होतो. जर तुम्हाला ते सांगतात त्यावर इतका विश्वास असेल तर तुम्ही शस्त्रक्रिया करून तुमचा मेंदू काढून का टाकत नाही? मग कळेल की ते त्यांचं व्यक्तिमत्व कसं वाढवतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा जो विस्तार तुमच्या मनात होतो, तुम्ही तो कमी करू शकत नाही. आणि जे कोणी म्हणतं कमी करता येऊ शकतो, तो तुमच्याशी धोकादायक खेळ खेळत आहे,” असं जावेद अख्तर म्हणाले होते.

पुरावे नसलेली कोणतीही गोष्ट म्हणजे श्रद्धा – जावेद अख्तर

या चर्चेत दोघांमध्ये श्रद्धेबद्दलही जोरदार वाद झाला होता. “तर्क, पुरावे नसलेली कोणतीही गोष्ट म्हणजे श्रद्धा. कधी कधी मला प्रश्न पडतो की श्रद्धा आणि मूर्खपणामध्ये काय फरक आहे? कारण मूर्खपणाची व्याख्याही सारखीच आहे. मी ‘श्रद्धा’ मान्य करायला तयार आहे, पण त्यात तर्क असायला पाहिजे,” असं जावेद अख्तर म्हणाले होते. पुढे सद्गुरू म्हणाले, “हे सगळं एका विशिष्ट विचारातून येत आहे. जेव्हा मी गेल्या वेळी जावेद साहेबांना भेटलो, तेव्हा ते मला सांगत होते की काही गुरूंनी त्यांना त्यांचं डोकं वापरू नका असं सांगितलंय. कोणी सांगितलं ते मला माहीत नाही, पण एक गोष्ट स्पष्ट दिसतेय की जावेद साहेबांनी त्यांचा सल्ला गांभीर्याने घेतला आहे.” यावर “मी कधीच कोणत्याही गुरूला गांभीर्याने घेतलेलं नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतोय,” असं जावेद अख्तर यांनी उत्तर दिलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जावेद अख्तर यांनी मिड-डे ला दिलेल्या अलिकडच्या मुलाखतीत सद्गुरूंबरोबरच्या वादावर भाष्य केलं होतं. तसेच त्यात मानवी अस्तित्वासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांची खिल्ली उडवली होती. “हा होमो सेपियन्सनी विचारलेला एक भडक प्रश्न आहे. त्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही गवताच्या पात्यासारखे निरर्थक आहात; असं तुम्ही मुंगी, झुरळ, डासाबद्दल कधीच म्हणणार नाही. खरं तर आपण सगळे सारखे आहोत, फक्त थोडे मोठे आहोत. अब्जावधी वर्षे जुन्या या विश्वात आपण ७०-८० वर्षांनी मरतो. बाकी काहीच नाही,” असं जावेद अख्तर म्हणाले होते.