एकाच चित्रपटात काम करताना एखादा अभिनेता अभिनेत्रीच्या प्रेमात पडणं मोठी गोष्ट नाही. कारण ते त्या चित्रपटात काम करताना काही महिने एकत्र घालवतात आणि मग त्यांना एकमेकांसाठी आपुलकी, प्रेम अशा भावना येऊ लागतात. दिग्गज अभिनेते राज कपूर आणि नर्गिस यांच्यासारखे कलाकार जेव्हा तब्बल १८ चित्रपटांमध्ये एकत्र काम करतात, तेव्हा एकमेकांबद्दल अशा भावना वाटणं सामान्य आहे.

‘बरसात’, ‘श्री ४२०’, ‘आवारा’ आणि ‘जागते रहो’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये एकत्र काम करताना राज कपूर व नर्गिस यांच्यात जवळीक वाढली. पण त्यावेळी राज कपूर आधीच विवाहित होते आणि त्यांना मुलं होती, तर दुसरीकडे नर्गिस सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण करत होत्या. नंतर नर्गिस यांनी अभिनेते सुनील दत्त यांच्याशी लग्न केलं आणि राज कपूर यांच्या कोणत्याही चित्रपटात काम केलं नाही. पण त्यांच्या नात्याबद्दलच्या अफवांमुळे दोन्ही कुटुंबांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि नर्गिस कपूर कुटुंबाने आयोजित केलेल्या कोणत्याही कार्यक्रमात कधीच सहभागी झाल्या नाहीत. हे सगळं २४ वर्षे चाललं. पण, शेवटी जेव्हा नर्गिस यांना राज कपूर यांचे सुपूत्र ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या लग्नाचे निमंत्रण देण्यात आले होते. त्या लग्नात नर्गिस पती सुनील दत्त यांच्याबरोबर लग्नाला आल्या होत्या.

सेटवरचं प्रेम, वयात १४ वर्षांचे अंतर अन् कडाक्याची भांडणं; अभिनेता म्हणाला, “एका क्षणी मला वाटलं…”

‘खुल्लम खुल्ला’ या पुस्तकात ऋषी कपूर यांनी त्यांच्या लग्नात नर्गिस दत्त आल्या होत्या, तेव्हाची आठवण सांगितली. लग्नात नर्गिस घाबरल्या होत्या, पण राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा कपूर यांनी त्यांचं मोकळेपणाने स्वागत केलं होतं, असा उल्लेख पुस्तकात आहे. “१९५६ मध्ये ‘जागते रहो’ चित्रपट पूर्ण झाल्यानंतर नर्गिसजींनी आरके स्टुडिओमध्ये पाय ठेवला नव्हता. तरीही त्या दिवशी त्या लग्नात सुनील दत्त यांच्याबरोबर आल्या होत्या. २४ वर्षांनंतर कपूर कुटुंबाच्या कार्यक्रमात सहभागी होत असल्याने त्या खूप घाबरल्या होत्या. त्या संकोचल्या आहेत हे माझ्या आईने ओळखलं आणि त्यांना बाजूला नेलं. ‘माझे पती खूप देखणे आहेत, ते रोमँटिकही आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल आकर्षण वाटणं मी समजू शकते. मला माहीत आहे की तू काय विचार करतेय, पण भूतकाळात जाऊ नकोस. तू माझ्या घरी एका आनंदाच्या प्रसंगी आली आहेस, आज आपण मित्र म्हणून एकत्र आहोत,” असं या पुस्तकात ऋषी कपूर यांनी लिहिलं आहे.

२० सिनेमे फ्लॉप, १३ वर्षे चित्रपटांपासून दूर; बॉलीवूड अभिनेता तरीही कमावतो बक्कळ पैसे, करतो ‘हे’ काम

पुस्तकात ऋषी कपूर यांनी आपल्या वडिलांच्या अफेअर्सबद्दल स्पष्ट लिहिलं आहे. नर्गिस व्यतिरिक्त राज कपूर यांचे वैजयंतीमाला यांच्याशी अफेअर होते, त्याचा उल्लेखही या पुस्तकात आहे. “माझ्या वडिलांचे नर्गिस जींबरोबर अफेअर होते तेव्हा मी खूप लहान होतो आणि त्यामुळे त्याचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. त्यांच्या अफेअरमुळे घरात काही घडल्याचं मला आठवत नाही. पण मला आठवतं की बाबांचं वैजयंतीमाला यांच्याबरोबर अफेअर होतं, त्यावेळी मी आईबरोबर मरीन ड्राईव्हवरील नटराज हॉटेलमध्ये शिफ्ट झालो होतो,” असं त्यांनी लिहिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी १९८८ मध्ये निधन झाले होते.