सध्या हिंदी चित्रपटसृष्टी किंवा बॉलिवूडमध्ये असा एकमेव दिग्दर्शक आहे जो हमखास सुपरहीट चित्रपट देऊ शकतो, तो म्हणजे रोहित शेट्टी. रोहित शेट्टीने बॉलिवूडच्या सगळ्या मोठमोठ्या स्टार्सबरोबर काम केलं आहे. याबरोबरच त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतात आणि त्याचा फायदा संपूर्ण टीमला होतो. रोहित शेट्टीचा ‘सर्कस’ हा मल्टीस्टारर चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याच्या प्रमोशनमध्ये रोहित सध्या व्यस्त आहे.

यानिमित्ताने रोहित शेट्टीने नुकतंच ‘द लल्लनटॉप’च्या एका कार्यक्रमात हजेरी लावली. हा कार्यक्रम एका मोठ्या ऑडीटोरियममध्ये आयोजित करण्यात आला होता. बरीच तरुण मंडळी इथे हजर होती. रोहित बरोबरच अभिनेता रणवीर सिंग आणि वरुण शर्मा यांनीसुद्धा या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. दरम्यान या तिघांनी सगळ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

आणखी वाचा : “माझ्यात प्रचंड माज…” तेजस्विनी पंडितचा मुलाखतीदरम्यान मोठा खुलासा

याच कार्यक्रमात जेव्हा दाक्षिणात्य चित्रपटांनी हिंदी चित्रपटावर केलेली कुरघोडी हा विषय निघाला तेव्हा रोहित शेट्टीने दिलेलं उत्तर ऐकून लोकांनी टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट केला. हे उत्तर देताना रोहितने अमिताभ बच्चन यांच्यापासून रणवीर सिंगपर्यंत कित्येक सुपरस्टार्सच्या चित्रपटांचा उल्लेख केला. ही लांबलचक यादी सांगताना प्रेक्षक चांगलेच उत्सुक झाले होते. या सगळ्याच शेवट करताना रोहित हिंदी चित्रपटांवर नाराज झालेल्या प्रेक्षकांना उद्देशून म्हणाला, “मुघल-ए-आजमसारखा चित्रपट आपण दिला, शोले आपण दिला, मदर इंडिया आपण दिला, मग एक वर्षं काय खराब गेलं तर तुम्ही लगेच आमच्याकडे पाठ फिरवलीत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहितचं हे उत्तर लोकांना प्रचंड आवडलं. शिवाय हासुद्धा एक वाईट काळ आहे तो निघून जाईल आणि आपलेही चित्रपट सुपरहीट व्हायला सुरुवात होईल असा आशावाद त्याने या मुलाखतीमध्ये मांडला आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित आगामी ‘सर्कस’ हा चित्रपट गुलजार यांच्या ‘अंगूर’ या चित्रपटाचा रिमेक आहे. यामध्ये रणवीर सिंग, वरूण शर्मा, जॅकलिन फर्नांडिज, पूजा हेगडे, जॉनी लिवर, संजय मिश्रा, अश्विनी काळसेकर, सिद्धार्थ जाधवसारखे मातब्बर कलाकार आहेत. हा चित्रपट २३ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.