Why Juhi Chawla Had A Secret Wedding: जुही चावला ही ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक लोकप्रिय अभिनेत्यांबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. आज अभिनेत्री चित्रपटांपासून दूर असली तरी ती सातत्याने चर्चेत असते.
जुही चावलाने जय मेहता यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली आहे. मात्र, अभिनेत्रीने गुपचूप लग्न केले होते, याबद्दल कोणालाही कल्पना दिली नव्हती. असे करण्यामागे नेमके कारण काय होते, याबद्दल तिने एका मुलाखतीत खुलासा केला होता.
जुही चावलाने का गुपचूप केले होते लग्न?
राजीव मसंद यांना जुही चावलाने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिला विचारले की तिने लग्न केले आहे हे सगळ्यांपासून लपवून का ठेवले? यावर बोलताना अभिनेत्री म्हणाली होती, “त्या काळात बहुतेकजण असेच करीत असत. त्यावेळी इंटरनेटची सुविधा नव्हती. तसेच प्रत्येकाच्या फोनमध्ये कॅमेरा नव्हता, त्यामुळे गुपचूप लग्न करणे सोपे होते.”
“जेव्हा मी माझ्या सासूला सांगितले की मला मोठे लग्न करायचे नाही, त्यावेळी त्यांनी लोकांना दिलेली आमंत्रणे रद्द केली. आम्ही फक्त ८०-९० लोकांच्या उपस्थितीत लग्न केले.”
“मला नुकतीच प्रसिद्धी मिळू लागली होती. माझे चित्रपट प्रेक्षकांना आवडत होते, त्यामुळे जयने मला लग्नाबाबत विचारले तेव्हा मी घाबरले. कारण लग्न केल्याचा माझ्या करिअरवर परिणाम होऊ शकतो, माझ्या हातातून चित्रपट जातील, असे मला वाटत होते. त्यावेळी मी काही मोठ्या चित्रपटांचे शूटिंग करत होते.
मला माझे करिअर करायचे होते, माझ्या आईचे नुकतेच निधन झाले होते, त्यामुळे सगळ्याच गोष्टी माझ्या हातातून निसटून जात असल्याचे मला वाटत होते”, असे म्हणत गुपचूप का लग्न केले होते यावर जुही चावलाने खुलासा केला होता.
सासूचे कौतुक करत अभिनेत्री म्हणाली होती, “आईच्या निधनानंतर मी खचले होते. पण, जय व त्याच्या पालकांनी खूप धीर दिला. विशेषत: त्याच्या आईने मला खूप सांभाळून घेतले. जयची आई मला नेहमी सांगत असे की तू माझ्या मुलीसारखी आहे. स्वत:ला माझी सून समजू नकोस. तुला ज्या गोष्टींनी आनंद मिळतो त्या कर. त्यांनी मला काम करण्याची परवानगी दिली.”
जय मेहता यांच्याबाबत जुही म्हणाली होती, “मी खूप लहान होते त्यावेळी आमची भेट झाली होती. तेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये कामदेखील करायला सुरुवात केली नव्हती. मित्रांबरोबर त्याची भेट झाली होती, त्यानंतर संपर्क तुटला.
एकदा मित्राच्या घरी पार्टीत आमची भेट झाली, त्यानंतर आम्ही पुन्हा बोलायला लागलो. त्यानंतर तो माझ्यासाठी फुले घेऊन येऊ लागला. तो प्रत्येक दिवशी माझ्यासाठी फुले घेऊन यायचा. माझ्या वाढदिवसाला त्याने एकदा ट्रकभरून लाल गुलाब दिले होती. एका वर्षानंतर त्याने मला प्रपोज केले.”
दरम्यान, जुही चावलाने अभिनयाबरोबरच उद्योजिका म्हणूनदेखील स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.