Virat Kohli Sister Bhawna Kohli: आयपीएल २०२५ चं विजेतेपद आरसीबीने जिंंकलं आणि विराट कोहली व आरसीबीच्या चाहत्यांचा १७ वर्षांचा ट्रॉफीचा दुष्काळ अखेर संपला. आरसीबीने आयपीएल 18 जिंकल्यावर चाहते, खेळाडू टीमवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. विराटची बहीण भावना कोहली ढिंगरा हिनेही एक पोस्ट करून आनंद व्यक्त केला. पण तिच्या पोस्टवर एका युजरने अशी कमेंट केली, ज्यावर भावनाने दिलेल्या उत्तराची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा व भावना या दोघींमध्ये सगळं आलबेल नसल्याची चर्चा होत होती. याचदरम्यान या युजरने केलेल्या कमेंटवर भावनाने स्पष्ट उत्तर देऊन सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला. युजरची कमेंट नेमकी काय आणि भावनाने काय उत्तर दिलं ते जाणून घेऊयात.
विराट कोहलीची बहीण भावनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर १८ वर्षांनंतर आयपीएलची ट्रॉफी जिंकणाऱ्या आरसीबीसाठी एक पोस्ट केली. यामध्ये तिने विराटचे फोटो शेअर केले आणि एक सुंदर कॅप्शन लिहिलं. एका फोटोमध्ये विराटबरोबर अनुष्का शर्मा देखील होती. चाहत्यांनी भावनाच्या या पोस्टवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला. पण एका युजरने भावनाच्या अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीबरोबरच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्यांच्यात सगळं आलबेल नसल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण भावनाने त्याला सडेतोड उत्तर दिलं.
भावना कोहलीने युजरला दिलं उत्तर
‘विराट कोहली त्याच्या कोणत्याही भाषणात तुझा उल्लेख का करत नाही? तो तुमच्या सोशल मीडिया पोस्ट कधीच लाइक करत नाहीत, अनुष्का शर्माही नाही,’ असं त्या युजरने लिहिलं होतं. युजरला उत्तर देताना भावना म्हणाली, “देव तुम्हाला हे समजून घेण्याचा संयम देवो की प्रेम वेगवेगळ्यात स्वरूपात असू शकतं, जे जगाला दाखवणं गरजेचं नाही. पण ते अजूनही अस्तित्वात आहे, जसे की देवावरील आपले प्रेम. आशा आहे की तुमच्या आयुष्यात पुरेसे प्रेम असेल आणि कोणतीही असुरक्षितता नसेल. फक्त खरी नाती, ज्यांना कोणत्याही व्हॅलिडेशनची गरज नसेल, देव तुमचं भलं करो.” भावनाने युजरला दिलेल्या उत्तराची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

दरम्यान, विराट कोहली व अनुष्का शर्मा दोघेही भावनाला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. काही दिवसांपूर्वी गायक राहुल वैद्यने विराट कोहलीवर टीका केली होती, तेव्हा विराटचा मोठा भाऊ विकास कोहली याने राहुलला चांगलंच सुनावलं होतं. प्रसिद्धीसाठी विराटवर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या गायनावर जास्त मेहनत घेतली असतीस तर लोकप्रिय झाला असतास, असं विकास राहुलला म्हणाला होता.