शाहरूख खान, दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि निर्माते-वितरक युटीव्ही कंपनी या त्रिकुटाचा ‘चेन्नई एक्स्प्रेस’ सध्या प्रदर्शनाआधीच विविध कारणांसाठी गाजतो आहे. एकतर दुनियादारी चित्रपटाबरोबर झालेल्या वादामुळे प्रदर्शनाआधी एक आठवडा अगोदर या चित्रपटाची चर्चा झाली.  आता या चित्रपटाचे उपग्रह हक्क तब्बल ४८ कोटी रूपयांना विकले गेले आहेत. त्यामुळे ९ ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित झाल्या झाल्या तीन दिवसांत जर त्यांना ५० ते ५५ कोटी रूपयांची कमाई करता आली तर पहिल्याच आठवडय़ात या चित्रपटाला शंभर कोटीचा आकडा पार करणे सहज शक्य होणार आहे.
‘रा. वन’नंतर नायक म्हणून शाहरूख खानने जाणीवपूर्वक चित्रपटांची निवड सुरू केली आहे. ‘जब तक है जान’ या चित्रपटामागे दिग्दर्शक म्हणून यश चोप्रांचा करिश्मा होता. त्यामुळे शाहरूख काहीसा आश्वस्त होता. मात्र, दुसरा चित्रपट करताना त्याने आपल्या पारंपारिक चोप्रा आणि करण जोहर कंपूला फाटा देत अजय देवगणला नायक म्हणून हिट चित्रपट देणाऱ्या रोहित शेट्टीच्या चित्रपटाची निवड केली. रोहित शेट्टी आणि शाहरूख ही जोडी नवीन असल्याने त्यांच्या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता आहे. शिवाय, पहिल्यांदाच या चित्रपटात दाक्षिणात्य संस्कृतीची जोड मिळाली आहे. हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी भरमसाठ प्रमोशन्स करण्याचेही शाहरूखने टाळले असून कमीत कमी वेळात चित्रपटाची प्रसिध्दी प्रभावीपणे व्हावी याासाठी त्याने हुशारीने दूरचित्रवाहिनीवरील चलती असणाऱ्या मालिका आणि रिअॅलिटी शोजचा आधार घेतला आहे. या सगळ्याचा फायदा त्यांना मिळाला असून चित्रपट प्रदर्शित व्हायला अजून आठवडा बाकी असताना या चित्रपटाचे उपग्रह प्रक्षेपणाचे हक्क ४८ कोटी रूपयांना विकले गेले आहेत. ‘रा. वन’ या आपल्याच बॅनरच्या चित्रपटासाठी जसे शाहरूखने जीवाचे रान केले होते. त्याचपध्दतीने तो ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या प्रसिध्दी, वितरण आणि विपणनाच्या योजनेत हिरीरीने सहभाग घेत आहे. दरदिवशी युटीव्हीच्या अधिकाऱ्यांबरोबर होणाऱ्या बैठकीला शाहरूख जातीने हजर असतो. याशिवाय, नावीन्यपूर्ण पध्दतीने चित्रपटाची प्रसिध्दी कशी होईल, यासाठीही तो नियोजन करत असल्याचे सूत्रांकडून समजते. त्याच्या या प्रयत्नांमुळे चित्रपटाने आत्ताच ४८ कोटी रूपये कमावले आहेत. त्यामुळे शंभर कोटीचा टप्पा चित्रपटासाठी अवघड नसल्याचे ट्रेड विश्लेषकांचे म्हणणे आहे.