डेली सोप क्वीन म्हणून ओळखली जाणारी एकता कपूर रुपेरी आणि छोट्या पडद्यावर नेहमीच प्रकाशझोतात असते. तिच्या बालाजी टेलिफिल्म्स या निर्मिती संस्थेअंतर्गत आजवर बऱ्याच चित्रपटांनी निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटनिर्मितीसोबतच कलाविश्वात असणारा एकताचा वावरही बऱ्याचदा अनेकांचे लक्ष वेधतो. एकता ही तिच्या रोखठोक वक्तव्यांसाठीदेखील ओळखली जाते. सध्याही ती अशाच एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

मालिका विश्वातून चित्रपटांच्या दिशेने तिने आपला मोर्चा वळविला आहे. एकताने आतापर्यंत ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’, ‘कोई आप सा’ ,’क्या कूल है हम’, ‘कृष्णा कॉटेज’, ‘कुछ तो है’, ‘क्यों की… मैं झूठ नहीं बोलता’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे. मात्र तिने केलेल्या चित्रपटांमध्ये अद्यापही बॉलिवूडचे सुपरस्टार सलमान खान किंवा शाहरुख खान झळकल्याचे दिसून आले नाही. आतापर्यत तिच्या या चित्रपटांमध्ये बड्या कलाकारांचा समावेश का नाही, याबाबत तिने आपले मौन सोडले आहे.

अभिनेता सलमान किंवा शाहरुख खान यांचे पूर्ण वर्षभराचे वेळापत्रक अतिशय व्यग्र असते. अशामध्ये त्यांना आमच्याबरोबर काम करण्याबाबत विचारायचे झाल्यास त्यासाठी किमान सहा महिने तरी मला वाट पाहावी लागेल. त्या एका कारणासाठी सहा महिने व्यर्थ घालवणे मला योग्य वाटत नाही. त्यापेक्षा त्यांच्या वेळापत्रकापासून लांबच राहणे मी जास्त पसंत करेन, असे एकता म्हणाली.

एकता पुढे असेही म्हणाली, की खरं पहायला गेलं तर मी या अभिनेत्यांना सरळ जाऊन विचारु देखील शकते. मात्र मला कोणाला त्रास द्यायचा नाही. आम्ही त्यांच्याबरोबर काम करत नाही याचा अर्थ असा नाही, आम्ही एखाद्या नवख्या अभिनेत्याला घेऊन १०० कोटींचा चित्रपट तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामागे एवढंच कारण की या अभिनेत्यांचा कामकाजात व्यत्यय नको.

दरम्यान, एकताने केवळ तात्पुरत्या स्वरुपात या अभिनेत्यांसह काम करण्यास नकार दिला आहे की संधी मिळाल्यास त्यांच्याबरोबर काम करेल हे मात्र गुलदस्त्यातच आहे.