Gaurav Taneja : अहमदाबाद विमान दुर्घटनानंतर गौरव तनेजा रोज या घटनेबद्दलचे अपडेट्स देत आहे. गौरवने याआधीच्या एका व्हिडीओमध्ये सांगितले होते की, हा अपघात इंजिनातील बिघाडामुळे झाला असावा. त्यानंतर त्याने ओव्हरलोडिंग हेदेखील या अपघाताचे कारण असू शकतं, असा अंदाजही वर्तवला. आता त्याने पुन्हा नवा व्हिडीओ शेअर करीत काही माहिती दिली आहे.
नवीन व्हिडीओमध्ये गौरव म्हणतो, “खराब हवामान असताना वैमानिकांना उड्डाण उशिरा करण्याचा किंवा उड्डाण रद्द करण्याचा इशारा मिळतो. ७८७ या फ्लाइटमध्ये एक डावीकडे आणि एक उजवीकडे, असे दोन हवामानविषयक रडार आहेत. सुरक्षितता आणि कार्यक्षमता व्यवस्थित असल्यानंतर उड्डाणासाठी या दोनपैकी एक तरी रडार कार्यरत असणं आवश्यक आहे.”
त्यानंतर ते म्हणतात, “एक विमान एका कार्यरत हवामान रडारसहदेखील सुरक्षितपणे उड्डाण करू शकते. फ्लाइट एआय-१७१ हे ७८७ ड्रीमलाइनरच्या घटनेत एक इंजिन जमिनीवर निकामी झाले आणि दुसरे टेकऑफनंतर निकामी झाले. ही अत्यंत दुर्मीळ बाब आहे. मी याबद्दल इतके दिवस संशोधन करीत आहे आणि मला त्याचा अजूनही नीट अर्थ लागलेला नाही.”
त्यानंतर गौरवनं नियमानुसार सांगितलं की, (उदाहरणादाखल) V1पर्यंत एका विशिष्ट गतीनं तुम्ही विमान पुढे घेऊन गेलात, तर तुम्हाला काहीही झालं तरी टेकऑफ करणं गरजेचंच असतं. त्याआधी काही बिघाड झाल्यास तुम्ही टेकऑफ न करण्याचा निर्णय घेऊ शकता.” त्यानंतर गौरवनं इंजिनामधील बिघाडाबद्दल माहिती दिली.
प्रत्येक विमानाच्या उड्डाणादरम्यान काही अडचणी येत असतात : गौरव तनेजा
याबद्दल तो असं म्हणाला, “प्रत्येक विमानाच्या उड्डाणादरम्यान काही अडचणी येत असतात. प्रत्येक विमानात MEL (Minimum Equipment List) असते. त्यानुसार कमीत कमी उपकरणं तरी असलीच पाहिजेत आणि ‘एअर इंडिया’ची विमानं कमीत कमी उपकरणांवरच चालत आहेत. कंपनीला या अडचणींकडे दुर्लक्ष करण्याची सवय आहे. याबद्दल इंजिनियर्सना माहिती असते, ते विमान कंपनीला माहीत आहे की, उड्डाणादरम्यान अडचण येईल.”
त्यानंतर गौरवनं या व्हिडीओमध्ये असं म्हटलं, “विमानाबद्दलच्या घडणाऱ्या प्रत्येक अडचणीचा थेट अहवाल कंपनीला जातो. कंपनीला सर्व काही माहिती आहे. या अडचणींबद्दल कंपनीला माहीत असूनही कंपनी विमानाच्या उड्डाणादरम्यान या अडचणींना तोंड देण्याची जबाबदारी पायलटवर सोपवतात. ते ग्राऊंडवर विमान नीट असल्याचं सांगत कंपनी विमान उड्डाण करण्यास पायलटला सांगतात.” दरम्यान, गौरव यानं या सगळ्यात सत्यता असण्याची खात्री न देता, ही त्याच्या मनातील गोष्ट असल्याचंही या व्हिडीओमध्ये स्पष्ट केलं आहे.