बॉलिवूड अभिनेता गोविंदा कादर खान यांना वडिलांच्या स्थानी मानायचा. चित्रपटसृष्टीतील त्याच्या यशात सर्वाधिक योगदान हे कादर खान यांचं होतं. मात्र, कादर खान यांची तब्येत बिघडल्यानंतर गोविंदानं एकदाही त्यांना फोन केला नाही, असं म्हणत दिवंगत अभिनेते कादर खान यांच्या मुलानं गोविंदाच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली मात्र या आरोपावर गोविंदानं काही बोलण्यास नकार दिला. ‘वो अभी बच्चे है’ असं म्हणत या वादावर व्यक्त होणं गोविंदानं टाळलं.

‘गोविंदा कादर खान यांना वडिलांच्या स्थानी मानायचा, मग त्यानं इतक्या वर्षांत त्यांना कितीवेळा फोन केला हे त्यालाच विचारावं, इतकंच कशाला वडिलांच्या निधनानंतरही गोविंदानं आम्हाला फोन करण्याचं सौजन्य दाखवलं नाही . हे चित्रपटसृष्टीतील वास्तव आहे इथे कोणाच्याच भावना या खऱ्या नसतात’ असं म्हणत सरफराजनं आपली नाराजी व्यक्त केली होती. याबद्दल गोविंदाला विचारलं असता तो लहान मुलगा आहे तो जो काही बोलला यावर व्यक्त होणं मला उचित वाटत नाही अशी प्रतिक्रिया गोविंदानं बीबीसी हिंदीशी बोलताना व्यक्त केली.

९० च्या दशकात डेव्हिड धवन, गोविंदा आणि कादर खान या त्रिकुटानं तर रुपेरी पडद्यावर अक्षरश: धुमाकूळ घातला. आपल्या टोकदार आणि अफलातून संवादालेखनानं त्यांनी गोविंदाची कारकीर्द खऱ्या अर्थानं घडवली होती.‘ते माझे उस्तादच नव्हते तर माझ्यासाठी ते वडिलांच्या स्थानी होते. त्यांच्या परिसस्पर्शानं त्यांनी प्रत्येक सामान्य कलाकाराला सुपरस्टार बनवलं. त्यांच्या जाण्यानं मी खूप काही गमावलं आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो इतकीच प्रार्थना मी करतो’ असं लिहित गोविंदानं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांना आदरांजलीही वाहिली होती.

मात्र प्रत्यक्षात कादर खान यांच्या तब्येतीची विचारपूस एकदाही गोविंदानं केली नाही असा आरोप सरफराजनं गेल्या आठवड्यात एका मुलाखतीत केल्यानंतर सरफराज विरुद्ध गोविंदा असा वाद रंगला. मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचं योग्य समजून गोविंदानं हा वाद क्षमवण्याचा प्रयत्न केला आहे.