छोट्या पडद्यावरील सुपरहिट आणि कायम आठवणीत राहिल अशा ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेचला आज १२ वर्ष पूर्ण होत आहेत. १ जून २००९ रोजी या मालिकेचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला होता. या मालिकेतल्या मानव-अर्चनाच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. मानव-अर्चनाची भूमिका साकारतानाच अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांचं नातं प्रेमात बदलू लागलं होतं. जवळजवळ ६ वर्ष दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका दोघांसाठीही खूप खास होती. मानव-अर्चनाच्या या ‘पवित्र रिश्ता’ मालिकेला १२ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अंकिताने सुशांतच्या आठवणीत एक व्हिडीओ शेअर केलाय.

अंकिता लोखंडे तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लाइव्ह आली होती. यावेळी तिने ‘पवित्र रिश्ता’ मालिकेला १२ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने फॅन मेड केक कापून तिच्या फॅन्ससोबत सेलिब्रेशन देखील केलं. यावेळी तिने सुशांतसोबतच्या काही खास आठवणी देखील शेअर केल्या आहेत. इन्स्टाग्रामवर लाइव्ह दरम्यान अंकित लोखंडे म्हणाली, “सुशांत आता आपल्यात नाही…त्याच्याशिवाय ‘पवित्र रिश्ता’ हा अपूर्ण आहे. अर्चनाचा मानव फक्त सुशांतच होता. मला विश्वास आहे, तो आता जिथे कुठे असेल तो तिथून मला पाहत असणार…तो जिथे कुठे आहे, तो आनंदी रहावा…सुशांतने मला अभिनय शिकवला…मला तेव्हा काहीच येत नव्हता…मी ज्यूनियर होती आणि तो माझ्यापेक्षा जास्त सिनियर होता…तो एक हूशार कलाकार होता…त्याच्यासोबत काम करताना मी स्वतःला खूप नशिबवान समजत होते.”

दोन दिवसांपूर्वीच अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतल्या सीन्सना एडिट करून व्हिडीओ शेअर केला होता. या मालिकेत पती-पत्नीची भूमिका साकारणारे सुशांत आणि अंकिता खऱ्या आयुष्यात एकमेकांच्या मनात बसले होते. ते लवकरच लग्नही करतील याची आशा लागलेली असतानाच अचानक लग्ना आधीच त्या दोघांमध्ये दुरावा आला आणि दोघे वेगळे झाले.

Ankita Lokhande Story
(Photo: Instagram@lokhandeankita)

बरोबर एक वर्षापूर्वी सुशांतचा संशयास्पद मृत्यू झाला. सुशांतच्या जाण्याने अंकिता लोखंडेला मोठा धक्का बसला होता. त्या दोघांचा ब्रेकअप झाला होता तरीही त्या दोघांच्या मनात एकमेकांसाठी कधी नकारात्मक भावना आली नव्हती. सुशांतला प्रगती करताना अंकिताला पहायचं होतं. त्याच्या मृत्यूनंतर त्याला न्याय मिळून देण्यासाठी सगळ्यांच्या आधी अंकिता उभी राहिली.

१४ जून २०२० रोजी सुशांतचा संशयास्पद मृत्यू झाला. बांद्रा इथल्या त्याच्या राहत्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह अढळून आला. त्याच्या मृत्यूबाबत तपास करण्यासाठी देशातल्या मोठ-मोठ्या संस्था कामाला लागल्या आहेत. सोमवारी ३१ मे रोजी सुशांतच्या घरी काम करणारा स्वयंपाकी नीरज आणि सहाय्यक केशव आणि सिद्धार्थ पिठाणी यांचीही पुन्हा चौकशी करण्यात आली. अमली पदार्थांसंबंधित प्रकरणात नीरज आणि केशव हे साक्षीदार झाले आहेत.