अभिनेता चिन्मय मांडलेकर सध्या त्याच्या मुलाच्या नावामुळे चर्चेत आहे. मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवल्यामुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. एवढंच नाहीतर चिन्मयच्या पत्नीला देखील ‘भारत सोडून जा’, ‘अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानात राहायला जा’, असे मेसेज केले होते. त्यामुळे चिन्मयने या ट्रोलिंगला संतापून यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका न करण्याचा निर्णय घेतला. अजूनही चिन्मयचं ट्रोलिंग प्रकरण सुरुच आहे. पण अशातच दुसऱ्याबाजूला, काल, २४ एप्रिलला दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात चिन्मयला त्याच्या ‘गालिब’ नाटकासाठी गौरविण्यात आलं.

दीनानाथ मंगेशकर यांच्या ८२व्या पुण्यतिथीनिमित्ताने काल, २४ एप्रिलला प्रतिष्ठित दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी मानाचा लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार महानायक अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आला. तसंच अशोक सराफांना मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्काराने गौरविण्यात आलं. याच वेळी अभिनेता चिन्मय मांडलेकर लिखित, दिग्दर्शित ‘गालिब’ या नाटकाला उत्कृष्ट नाट्यनिर्मितीसाठी मोहन वाघ पुरस्कार उषा मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

हेही वाचा – “एका असामान्य परिवाराकडून…”, पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले…

पुरस्कार स्वीकारल्यानंतर चिन्मय आभार मानत म्हणाला, “सर्व मान्यवारांना नमस्कार, सभागृहात कर्तुत्वाने खूप मोठी असलेली माणसं आहेत, त्यांना सर्वांना प्रणाम. नाटकाला पुरस्कार मिळणं ही खूप गोष्ट आहे. यामध्ये संपूर्ण टीमची मेहनत आहे. आमच्या निर्मात्यांचे मी आभार मानतो. फक्त एकच गोष्ट बोलेन, भारतात जन्मलेल्या कोणत्याही मुलाच्या डीएनएमध्ये विशेष म्हणजे महाराष्ट्रात जन्मलेल्या कोणत्याही मुलाच्या डीएनएमध्ये तीन नावं असतात. एक असतं मंगेशकर, दुसरं असतं बच्चन आणि तिसरं नाव कारण मी महाराष्ट्रातून आहे ते म्हणजे सराफ.”

हेही वाचा – Video: ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत झळकलेल्या ‘या’ अभिनेत्रीची ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये एन्ट्री, साकारणार महत्त्वाची भूमिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे चिन्मय म्हणाला, “नकळत्या वयापासून शिवकल्याण राजा कानावर पडलं. जेव्हापासून कळायला लागलं तेव्हा पहिला चित्रपट ‘नमक हलाल’ होता. ‘अशी ही बनवाबनवी’ कमीत कमी १०० वेळा आम्ही सगळ्यांनी पाहिला आहे. इथूनच प्रेरणा घेऊन आज इथंपर्यंतचा प्रवास झाला आहे. जेव्हा कोणी विचारतं तू या क्षेत्रात का आला आहेस? तेव्हा या उत्तरात डीएनएमध्ये असलेली ही तीन नावं कारणीभूत आहेत. मंगेशकर, बच्चन आणि सराफ.”