अभिनेते शरद पोंक्षे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. सामाजिक-राजकीय घडामोडींवर ते नेहमी त्यांचं मत मांडत असतात. शरद पोंक्षे नुकतेच ‘बंजारा’ या चित्रपटात झळकले होते. ‘बंजारा’ची निर्मिती त्यांनीच केली होती; तर या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांचा मुलगा स्नेह पोंक्षेने केलं होतं. या चित्रपटातून त्याने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. या चित्रपटाच्या निमित्ताने शरद यांनी मागे काही मुलाखती दिल्या, यामध्ये त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं होतं. अशातच त्यांनी दिलेल्या ‘राजश्री मराठी शोबझ’च्या मुलाखतीमध्येही त्यांच्या स्वभावाबद्दल सांगितलं होतं.
‘राजश्री मराठी शोबझ’च्या मुलाखतीमध्ये शरद पोंक्षे यांना “तुमच्या या स्वभावाचा किंवा या स्पष्टवक्तेपणाचा कधी तोटा झाला आहे का”, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले, “माझ्या या स्वभावाचा मला खूप तोटा होतो. अनेक लोकांना मी नको असतो. खूपशा पुरस्कार सोहळ्यांना मला बोलावलं जात नाही. त्यांना भिती वाटते की हा काय बोलेल. पण, मला त्याबद्दल काही वाटत नाही. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये वाटायचं की आपल्याला का नाही बोलवत. पण, आता मला कळलं की खोटं आहे हे सगळं. जशी नाटकातील आई खोटी असते, बाबा खोटे असतात, नाटकातील नाती, सेट सगळं खोटं असतं; तशी इथली बरीच माणसं खोटी असतात. खोटं खोटं वागतात, खोटं बोलतात आणि समोर असलो की, उत्साहाने ए शरद असं बोलतात, पण ते कळतं लगेच.”
“मला फार मित्र पण नाहीत आणि नकोच, ते काय करायचं आहे त्यांचं. ठराविक पाच-साह मित्र आहेत. ‘बंजारा’च्या निमित्ताने दोन अतिशय छान मित्र झाले आहेत. जी खूप खरी, आंतरबाह्य स्वच्छ माणसं आहेत. अशाच माणसांबरोबर माझी मैत्री होऊ शकते. आमची आधीपासूनच मैत्री होती, पण या चित्रपटामुळे ती आणखी घट्ट झाली. एक सुनील बर्वे आणि एक भरत जाधव. कारण ही दोन्ही चांगली माणसं आहेत.”
दरम्यान, शरद पोंक्षे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आजवर त्यांनी नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं आहे. परंतु, रंगभूमीकडे त्यांचा कल नेहमीच जास्त राहिला आहे. सध्या रंगभूमीवर त्यांचं ‘पुरुष’ हे नाटक सुरू आहे. यामध्ये त्यांच्यासह अभिनेत्री स्पृहा जोशी मुख्य भूमिकेत आहे, तर अभिनेते अविनाश नारकरही यामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.