शिवराज वायचळ दिग्दर्शित ‘आता थांबायचं नाय’ सिनेमा १ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. या सिनेमात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, पर्ण पेठे, ओम भूतकर अशी जबरदस्त स्टारकास्ट आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या सिनेमाचं भरभरून कौतुक करण्यात येत आहे.

लोकप्रिय अभिनेता शशांक केतकरने खास व्हिडीओ शेअर करत या सिनेमाच्या संपूर्ण टीमवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तो नेमकं काय म्हणाला सविस्तर जाणून घेऊयात..

शशांक केतकर काय म्हणाला?

शशांक केतकर म्हणाला, ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट मी काल ( १० जून ) पाहिला. मला मान्य आहे की, हा चित्रपट प्रदर्शित होऊन ६ आठवडे झाले आहेत आणि मला हा चित्रपट एवढे दिवस पाहता आला नाही. पण, मंगळवारी मी ठाण्यात या सिनेमाचा शो पाहिला. महत्त्वाचं म्हणजे ६० ते ७० टक्के थिएटर भरलेलं होतं. या सिनेमातल्या अनेक गोष्टी मला आवडल्या आहेत. शिवराज वायचळचं लेखन, त्याचं दिग्दर्शन, त्याचा सच्चेपणा, त्याने सिनेमासाठी केलेल्या पात्रांची निवड…चित्रपटाचा एकंदर विषय, याचा परिणाम, चित्रपटाची प्लेसमेंट अशा वेगवेगळ्या कारणांमुळे मला हा सिनेमा आवडला आहे.

सर्वप्रथम मला शिवराज वायचळच्या लेखन-दिग्दर्शनाचं प्रचंड कौतुक करायचं आहे. शिवराज आय लव्ह यू मित्रा…तू काय दर्जाची फिल्म लिहिली आहेस…आपली फार मैत्री नाहीये. पण, तुझ्यातला सच्चा माणूस मला माहितीये जो कधीच लोकांबद्दल, घटनांबद्दल वाईट विचार करूच शकत नाही. ही तुझी सकारात्मकता तुझ्या सिनेमाच्या गोष्टीत उतरली आहे. ‘झी स्टुडिओज’चे देखील मी आभार मानेन की, एवढ्या चांगल्या विषयाच्या ते पाठिशी उभे राहिले. आणखी एका व्यक्तीचे आभार मानेन ते म्हणजे तुषार हिरानंदानी. कारण, तुषार सरांबरोबर मी ‘स्कॅम’ सीरिजच्या निमित्ताने काम केलं होतं आणि त्यांचाही या चित्रपटाला पाठिंबा होता.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमाचं कास्टिंग. इतकं परफेक्ट कास्टिंग मी आजवर नाही पाहिलंय, कमालीचं लिखाण मग अगदी वन लायनर वाक्य असूदे किंवा विशिष्ट प्रसंग…हे सगळं काही व्यवस्थित मांडलं आहे आणि याचं क्रेडिट शिवराजचं आहे. सुपरस्टार भरत जाधव, सुपरस्टार सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर, रोहिणी मावशी, प्राजक्ता आणि माझा भयंकर आवडता अभिनेता ओम भूतकर त्याच्यासह चित्रपटातील अन्य कलाकारांचंही कौतुक. त्यांची मला नावं माहिती नाहीयेत. पण, सर्वांची कामं इतकी चोख आहेत की, आयुष्यभर त्या भूमिका माझ्या मनात राहतील.

हा चित्रपट सर्वांगीण अनुभव देणारा आहे. हा मराठी चित्रपट जरूर बघायला जा…अजिबात चुकवू नका. मला हा सिनेमा कोणत्या दर्जाचा वाटतोय माहितीये का? ‘स्वदेस’, ‘लगान’, ‘चक दे इंडिया’, ‘रंग दे बसंती’ या चित्रपटांच्या तोडीस तोड ‘आता थांबायचं नाय’ हा सिनेमा आहे. तर, मला वाटतं ही वर्ल्ड क्लास फिल्म तुम्ही सर्वांनी नक्की पाहावी.

हा सिनेमा पाहताना खूप हसलो आणि खूप रडलो सुद्धा…त्यातलं प्रत्येक वाक्य मला भावलं. शिवराज या सुंदर अनुभवासाठी खूप-खूप आभार. फक्त ६ नाहीतर ६० आठवडे हा सिनेमा थिएटर्समध्ये चालू राहूदेत. भरत जाधव या सुपस्टारला आताच दिल्लीला न्या आणि राष्ट्रीय पुरस्कार द्या… इतकं कमाल काम केलंय. शिवराजला सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार द्या.

राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या चित्रपटाला द्यावा, कोणता चित्रपट ऑस्करला पाठवावा…अगदी त्या दर्जाची फिल्म पाहायची आहे तर, हात जोडून सांगतो नक्की जाऊन ‘आता थांबायचं नाय’ हा सिनेमा बघा. पुन्हा एकदा शिवराज थँक्यू सो मच…गॉड ब्लेस यू.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शशांकच्या या पोस्टवर दिग्दर्शक शिवराजने, “धन्यवाद भाई…खूप भारी वाटलं” अशी कमेंट करत अभिनेत्याचे आभार मानले आहेत. याशिवाय अशाप्रकारे पोस्ट शेअर करत मराठी सिनेमाला पाठिंबा दिल्याने नेटकऱ्यांनी शशांकचंही कौतुक केलं आहे.