‘सावरखेड एक गाव’मधील अजय असो किंवा ‘ओम शांती ओम’चा पप्पू मास्टर ज्याच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं असा मराठीसह बॉलीवूडकरांचा लाडका अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे! ‘आभाळमाया’पासून त्याचा प्रवास सुरू झाला अन् त्यानंतर श्रेयसने कधीही मागे वळून पाहिलं नाही. रंगभूमी, दूरदर्शन, छोट्या पडद्यावरील मालिका, मराठी चित्रपट ते बॉलीवूड असा संपूर्ण प्रवास करत अभिनेत्याने यशाचं शिखर गाठलं. या सगळ्या प्रवासात श्रेयसला कोणताही ‘गोलमाल’ न करता प्रेक्षकांचं ‘हाऊसफुल’ प्रेम मिळालं. इंडस्ट्रीत कोणाचंही पाठबळ नसताना त्याने एकट्याने ‘झुंज’ देत अनेक कठीण प्रसंगांत ‘बाजी’ मारली. अशा या प्रेक्षकांच्या मनाशी ‘रेशीमगाठ’ बांधणाऱ्या गुणी अभिनेत्याचा आज ४८ वा वाढदिवस.

श्रेयसचा जन्म २७ जानेवारी १९७६ रोजी मुंबईतील दादर भागात झाला. अभिनेत्याच्या जन्मानंतर पुढे काही वर्षातच, तळपदे कुटुंबीय अंधेरीला राहायला गेले. अंधेरी मधील श्री राम वेलफेयर सोसायटी हायस्कूलमध्ये त्याने आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी श्रेयसने मिठीबाई कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मध्यमवर्गीय व सर्वसामान्य घरात जन्म झाल्यामुळे श्रेयसला आपलं अभिनय क्षेत्रात करिअर घडेल असं कधीही वाटलं नव्हतं. अभ्यासात फारसं यश मिळत नसल्याने श्रेयस तेव्हा फक्त क्रिकेट खेळायचा. परंतु, कॉलेजमध्ये गेल्यावर त्याच्या मनात आपोआप रंगभूमीबद्दल आकर्षण निर्माण झालं. आयुष्यात आलेल्या विविध चढउतारांमुळे श्रेयसच्या जीवनाला एक नवीन कलाटणी मिळाली.

Kolhapur, Kolhapur lok sabha,
उद्योजक ते कलाकार… कोल्हापुरात सारेच प्रचारात
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
82 year old CSK fan's tribute post for MS Dhoni wins internet
“मी धोनीसाठी आले आहे!”, ८२ वर्षीय आजीची सर्वत्र हवा! Viral Video एकदा बघाच
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral

हेही वाचा : विजय सिंग देओल ते लॉर्ड बॉबी; कमबॅक कसं असावं हे दाखवून देणाऱ्या ज्युनिअर देओलचा थक्क करणारा प्रवास

श्रेयसने इतर मुलांप्रमाणे नोकरी करून आपलं जीवन जगावं अशी त्याच्या आईची प्रचंड इच्छा होती. यासाठीच आपल्या लेकाने बँकेच्या परीक्षा द्याव्यात असा त्यांचा हट्ट होता. परंतु, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. श्रेयसने कधीच मनापासून बँकेच्या परीक्षांचा अभ्यास केला नाही. प्रत्येक परीक्षेत तो नापास व्हायचा. अखेर कालातरांने अभिनेत्याने टेलिव्हिजन मालिका विश्वात आपला जम बसवला अन् आईला “मी उत्तम अभिनेता जरुर होईन!” असं मोठ्या विश्वासाने सांगितलं.

श्रेयसला सुरुवातीच्या काळात खूप कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला होता. अनेकदा ऑडिशनला गेल्यावर त्याच्याकडे जेवणासाठी देखील पैसे उरायचे नाहीत. आताच्या घडीला कोट्यवधींचा मालक असणाऱ्या श्रेयसकडे एकेकाळी घरभाडं द्यायला देखील पैसे उरले नव्हते. संघर्षाचा काळ सुरू असताना श्रेयसने अनेक ठिकाणी नोकरी व स्टुडिओमध्ये कामासाठी विचारलं. बसच्या तिकिटाचे पैसे नसताना वेळप्रसंगी त्याने चालत प्रवास केला. पण, आयुष्यात कधीही हार मानली नाही. त्याच हाच संघर्ष आज त्याला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन गेला आहे.

हेही वाचा : केदार शिंदे – हरहुन्नरी दिग्दर्शकाची बहुढंगी सफर

श्रेयसने अभिनयाव्यतिरिक्त डबिंग क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. देशभरात ब्लॉकबस्टर ठरलेल्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाचं हिंदी डबिंग श्रेयसने केलं आहे. घराघरांत गाजणारा ‘झुकेगा नहीं साला’ हा डायलॉग पडद्यावर अल्लू अर्जुन म्हणताना दिसत असला तरीही, यामागचा खरा ‘पुष्पा’ आपला मराठमोळा श्रेयस आहे.

श्रेयसच्या रील आयुष्याप्रमाणे त्याचं रिअल आयुष्य देखील तेवढंच फिल्मी आहे. २००० साली एका कॉलेज फेस्टिव्हलमध्ये श्रेयसला त्याची आयुष्याभराची जोडीदार भेटली. त्यावेळी श्रेयस एका लोकप्रिय मराठी कार्यक्रमात काम करत असल्याने नामांकित महाविद्यालयाने त्याला एका फेस्टिव्हलसाठी निमंत्रित केलं होतं. त्या महाविद्यालयात दीप्ती जीएस (जनरल सेक्रेटरी) म्हणून काम पाहत होते. तिथेच दोघांची पहिली भेट झाली. पहिल्या भेटीतच श्रेयस दीप्तीच्या प्रेमात पडला होता. तिच्याआधी तो इतर कोणत्याही मुलीबरोबर डेटवर गेला नव्हता. श्रेयसने दीप्तीला लग्नाची मागणी घातल्यावर तिने होकार द्यायला तब्बल ३ वर्षे लावली होती. पुढे, श्रेयस-दीप्तीने ३१ डिसेंबर २००४ मध्ये लग्न केलं. ‘प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो’, त्याप्रमाणे माझ्यामागे दीप्ती आहे.’ असं अभिनेता अनेक मुलाखतींमध्ये अभिमानाने सांगतो.

हेही वाचा : सयाजी शिंदे : साताऱ्यात वॉचमनची नोकरी, टॉलीवूडचा ‘डॅशिंग व्हिलन’ ते सह्याद्रीला आपलंस करणारा वृक्षप्रेमी अभिनेता 

इक्बाल चित्रपट व लग्न

लग्नादरम्यान श्रेयसला त्याचा पहिलावहिला हिंदी चित्रपट मिळाला. त्या चित्रपटाचं नाव होतं ‘इक्बाल’. यादरम्यान श्रेयसचं लग्न होणार होतं. श्रेयसने दिग्दर्शकाला सांगितले की, “माझं लग्न असल्याने कृपया मला एक दिवस त्यासाठी द्या.” तेव्हा त्याची विनंती दिग्दर्शकाने मान्य केली नाही उलट त्याला सल्ला दिला की “तू लग्न पुढे ढकल, नाहीतर मला दुसरा विचार करावा लागेल” मात्र श्रेयसकडे बघून अखेर त्यांनी माघार घेतली आणि त्याला लग्नासाठी एक दिवस सुट्टी दिली. शिवाय ‘इक्बाल’ चित्रपटाचं कथानक लक्षात घेऊन श्रेयसला चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत त्याचं लग्न झालंय असं कुठेही सांगायचं नाही असं दिग्दर्शकाने बजावलं होतं. श्रेयसने चित्रीकरणामधून वेळ काढत मुंबई गाठली लग्न केलं आणि पुन्हा दुसऱ्याच दिवशी हैदराबाकडे प्रस्थान केलं. ‘इक्बाल’ चित्रपटाच्या प्रीमियरला श्रेयसची पत्नी दीप्तीने नागेश कुन्नूरची बहीण म्हणून हजेरी लावली होती.

दरम्यान, श्रेयसने आजवर ‘पछाडलेला’, ‘इकबाल’, ‘वेलकम टू सज्जनपूर’, ‘आपडी थापडी’, ‘ओम शांती ओम’, ‘गोलमाल’ अशा अनेक दमदार चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत. फक्त चित्रपटच नव्हे तर ‘आभाळमाया’, ‘अमानत’, ‘दामिनी’, ‘माय नेम इज लखन’, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ अशा मालिकांमधून श्रेयसने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप उमटवली आहे.

दमदार अभिनय, रोमँटिक हिरो ते विनोदाचं अचूक टायमिंग साधणाऱ्या या बहुरंगी अभिनेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!