‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे सखी गोखले आणि सुव्रत जोशी यांची जोडी घराघरांत लोकप्रिय झाली. मालिकेत एकत्र काम करताना त्यांच्यात खूप चांगली मैत्री झाली होती आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. २०१९ मध्ये सखी आणि सुव्रतने लग्नगाठ बांधली. पण, लग्नाअगोदर सखी-सुव्रत काही काळ लिव्ह इनमध्ये राहत होते. याबद्दल सखीची आई व लोकप्रिय अभिनेत्री शुभांगी गोखले यांना ‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अभिनेत्रीने एक आई म्हणून त्यांनी या सगळ्याकडे कसं पाहिलं याचा अनुभव सांगितला आहे.

सध्याच्या काळानुसार सखी-सुव्रत लग्नाआधी एकत्र राहत होते. एक पालक म्हणून तुम्ही याकडे कसं पाहिलं? यावर शुभांगी गोखले म्हणाल्या, “या गोष्टीच्या २० ते २५ वर्षे आधी मी आणि मोहन सुद्धा लिव्ह इनमध्ये राहिलो होतो. आमच्या घरी आधीपासून माहिती होतं, लग्न करायचं हे सुद्धा निश्चित होतं. मोहनचं ‘मिस्टर योगी’ तेव्हाच येणार होतं आणि त्याला खात्री होती की, सगळीकडे हे लोकप्रिय होणार… त्यामुळे त्या गोष्टीची आम्ही वाट पाहत होतो. मी सुद्धा तेव्हा भावाकडे मुंबईत आले होते, अगदी पटकन लग्न केलं असं व्हायला नको. त्यामुळे मी सुद्धा वेळ घेतला. ‘मिस्टर योगी’ मालिका २ डिसेंबरला संपली आणि आम्ही १० डिसेंबरला लग्न केलं. तोवर आम्ही एकत्र राहत होतो. पण, त्यावेळी लग्न करायचं हे नक्कीच ठरलं होतं…ट्रायिंग आऊट वगैरे असं काहीच नव्हतं. त्यामुळे सखीच्या बाबतीत सुद्धा मला काहीच अडचण नव्हती.”

आईला सगळ्या गोष्टी कळतात – शुभांगी गोखले

शुभांगी गोखले पुढे म्हणाल्या, “सुव्रतला एकटं राहायचं नव्हतं. तो आमच्या जवळपास राहायचा. मग मला म्हणाला, मी तुझ्याकडे राहायला येऊ का…म्हणजे मला चांगलं खायला मिळेल. कारण, त्याची तेव्हा तब्येत सुद्धा बरी नव्हती. आमच्या घरी तो अगदी माझ्या मुलासारखा राहिला. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच तो मला म्हणाला, तुझ्या लक्षात आलं असेल ना थोडफार की, आम्ही एकमेकांमध्ये इंटरेस्टेड आहोत. पण, सखी म्हणाली होती की, आम्ही फक्त मित्र आहोत. आता आईला सगळ्या गोष्टी कळून जातात. आईला कोणीच गंडवू शकत नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिका संपल्यावर मग ‘अमर फोटो स्टुडिओ’ करायचं ठरलं. तेव्हा पुण्याला सखी माझ्याच घरी राहणार होती. त्यावेळी ती म्हणाली, मी असं ठरवतेय की, आम्ही दोघं एकत्र शिफ्ट होतो. मी म्हटलं चालेल पण, याला एक कायमची फ्रेम असणार आहे ना तरच एकत्र राहा. मग ते एकत्र राहिले, त्यांचा साखरपुडा केला. मग, नंतर त्यांचं लग्न झालं. सखी शिक्षणासाठी बाहेरगावी गेली. आताच्या काळात प्लॅन बी आवश्यक आहे म्हणूनच सखीने ते शिक्षण पूर्ण करावं असं माझं मत होतं.” असं शुभांगी गोखले यांनी स्पष्ट केलं.