Bandaa Movie Review : २०२३ हे साल बॉक्स ऑफिसवर इतिहास रचणाऱ्या ‘द केरला स्टोरी’मुळे स्मरणात राहील. ज्या पद्धतीने या चित्रपटातून एक भयानक वास्तव लोकांसमोर मांडण्यात आलं तसंच आणखी एक दाहक वास्तव मांडणारा ‘सिर्फ एक बंदा काफी है’ हा चित्रपट नुकताच ओटीटीवर येऊ घातला आहे. कोणताही राजकीय अजेंडा न रेटता हा चित्रपट त्याच्या कथेशी आणि त्यात दाखवलेल्या वास्तवाशी प्रामाणिक राहतो आणि यामुळेच हा २०२३ चा ओटीटीवर प्रदर्शित झालेला सर्वोत्तम चित्रपट ठरला आहे.

ट्रेलरमधूनच हा चित्रपट नेमकं कोणत्या घटनेवर भाष्य करणार आहे, हे आपल्याला समजलं आहेच. शिवाय अशा धाटणीचं कथानक प्रकाश झा दिग्दर्शित ‘आश्रम’ या वेब सीरिजमधून आपण पाहिलं आहे. तरी मग हा चित्रपट का वेगळा ठरतो? हा चित्रपट वेगळा ठरतो ते त्याच्या मांडणी आणि सादरीकरणामुळे. धर्मगुरू किंवा हे बाबा लोक यांची पोलखोल हा या कथानकाचा गाभा आहे. तरी या चित्रपटातून कोणत्याही धर्माबद्दल आक्षेपार्ह असा एकही शब्द किंवा संवाद न वापरता हा चित्रपट न्यायव्यवस्था, समाजव्यवस्था, पोलीस यंत्रणा आणि अंधभक्तांवर चांगलेच ताशेरे ओढतो.

Chunky Panday on daughter Ananya Panday relationship with Aditya Roy Kapur
“ती माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावते, त्यामुळे…”, चंकी पांडेचं अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूरच्या नात्याबद्दल विधान
Mahavikas Aghadi, Kapil Patil,
महाविकास आघाडीतील विसवंदामुळे भिवंडीत कपिल पाटील यांना कठीण पेपर सोपा?
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
Uddhav Thackeray Patrika Major Change On 1st May
उद्धव ठाकरेंच्या कुंडलीत ‘१ मे’ला मोठा बदल, यश येईल भाळी; ज्योतिषी उल्हास गुप्ते सांगतायत नेमकं घडणार काय?

ही कहाणी एका मुलीची आहे. जिचे लहान वयातच एका धर्मगुरूकडून लैंगिक शोषण होते. त्यानंतर मात्र ती मुलगी तिच्या आई-वडिलांसह या धर्मगुरूविरोधात कोर्टात जायचं ठरवते आणि पुढे या केसमध्ये नेमकं काय होतं? त्या मुलीला न्याय मिळतो की नाही? त्यासाठी नेमकी काय किंमत तिला चुकवावी लागते? यात एक इमानदार वकील तिची कशी मदत करतो? हे सगळं या चित्रपटात तुम्हाला बघायला मिळेल.

आणखी वाचा : The Kerala Story Review : ३२ हजार महिलांचं धर्मांतर अन् ISIS मध्ये समावेश केल्याचा दावा, ‘द केरला स्टोरी’ नेमका कसा आहे?

या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे हा चित्रपट अगदी ‘टू द पॉइंट’ आहे. कुठेही जास्तीचा ड्रामा नाही, फाफटपसारा नाही. अगदी सुरुवातीच्या फ्रेमपासूनच हा चित्रपट थेट मुद्द्याला हात घालतो. कथा किंवा पटकथा कुठेही रेंगाळत नाही आणि यामुळेच प्रेक्षकही खुर्चीला खिळून राहतात. याबरोबरच हा चित्रपट एक उत्तम कोर्टरूम ड्रामाही सादर करतो, जो गेल्या बऱ्याच कालावधीत हिंदी चित्रपटांत पाहायला मिळालेला नाही. बाकी दोन तास सात मिनिटांच्या या चित्रपटात संगीत हे केवळ नाट्य गडद करण्यापुरतंच आहे, कारण या चित्रपटाचा खरा हीरो याची कथा आहे आणि त्यालाच यात महत्त्व देण्यात आलं आहे.

दीपक किंगरानी यांनी अत्यंत बारकाईने ही कथा आणि यातील संवाद लिहिले आहेत. वरवर जरी हा एक कोर्टरूम ड्रामा वाटत असला तरी समाजाच्या मानसिकतेबद्दल हा चित्रपट मोठं भाष्य करतो. खासकरून यातील प्रमुख पात्र पी. सी. सोलंकी जे मनोज बाजपेयी यांनी निभावलं आहे, हे पात्र चित्रपटात धर्माच्या या ठेकेदारांविरोधात कोर्टात युक्तिवाद करताना जरी दाखवलं असलं तरी तो एक बाप म्हणून आपल्या मुलांवर योग्य धर्मसंस्कार करताना दाखवला आहे. जेव्हा पीडित मुलीचे आई-वडील या वकिलाकडे येऊन आपलं गाऱ्हाणं गातात, तो सीन, त्यात मनोज बाजपेयी यांची अदाकारी आणि शेवटी “फी किती घेणार?” या आई-वडिलांच्या प्रश्नावर “मुलीच्या चेहऱ्यावरचं हसू” असे त्या वकिलाच्या तोंडचे शब्द हे सगळंच मनाला स्पर्शून जाणारं आहे.

खासकरून या चित्रपटाच्या क्लायमॅक्सचं कोर्टातील भाषण तुम्हाला हादरवून सोडणारं आहे. संपूर्ण चित्रपटाचं सार हे मनोज यांच्या त्या शेवटच्या स्पीचमध्येच दडलेलं आहे.  ‘पाप, अतिपाप आणि महापाप’ यातील फरक यात आपल्याला समजून सांगितला आहे. हा फरक समजवताना रामायण, रावण आणि शंकराचा दिलेला संदर्भ आणि त्याचं या केसशी लावलेलं कनेक्शन हे ऐकल्यावर काही क्षण आपण खरंच सुन्न होऊन जातो.

‘Aspirants’सारखा टीव्हीएफचा लोकप्रिय शो देणारे दिग्दर्शक अपूर्व सिंह कार्की यांच्या हटके आणि उत्तम दिग्दर्शनामुळेच हा चित्रपट वेगळा ठरतो. याबरोबर इतरही सहकलाकारांनी अप्रतिम काम केलेलंच आहे पण या कथेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे ते मनोज बाजपेयी यांच्या अभिनयाने! जोधपूरच्या वकिलांची भाषा, देहबोली, हे तर मनोज यांनी हुबेहूब सादर केलं आहेच, पण या कथानकाला ज्या प्रकारचा संयत अभिनय अपेक्षित होता तो मनोज यांच्या बहारदार अदाकारीमधून ठळकपणे जाणवतो. चित्रपटाचा संपूर्ण भार मनोज यांनी त्यांच्याच खांद्यावर घेतला आहे. त्यामुळे याबाबतीत मात्र आपण नक्कीच म्हणू शकतो की ‘सिर्फ एक बंदा काफी है’. उत्तम कथा आणि त्याला मिळालेली सुयोग्य दिग्दर्शन आणि लाजवाब अभिनयाची जोड यासाठी ‘बंदा’ हा चित्रपट एकदा तरी प्रत्येकाने ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघायलाच हवा.