नवनवे प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत येत असतात. आता आगामी ‘कप बशी’ या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उलगडणार असून सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे.
‘कप बशी’ या चित्रपटाची निर्मिती सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक सदानंद जोशी यांची असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट असला, तरी त्यांचे चित्रपटसृष्टीशी असलेले नाते जुनेच आहे. त्यांचे वडील सदानंद जोशी यांनी १९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘पुत्रवती’ या चित्रपटासाठी कथा, पटकथा, गीतलेखन आणि निर्मिती अशा सर्वच बाजूंवर काम केले होते. तो चित्रपट राष्ट्रीय, राज्यस्तरीय १४ पुरस्कारांनी गौरवला गेला होता. त्यामुळे वडिलांचे प्रेरणादायी काम आणि त्यांचा कलात्मक वारसा आता ‘कप बशी’ या चित्रपटातून ते पुढे आणत आहेत.
वैभव चिंचाळकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी ‘कन्यादान’, ‘नकुशी’, ‘शुभमंगल ऑनलाइन’, ‘पुढचं पाऊल’ अशा अनेक गाजलेल्या मालिका तसेच ‘पुष्पक विमान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
उत्तम आशय, तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम करण्यासाठी वैभव यांचे नाव घेतले जाते. तर अभिनेत्री पूजा सावंत हिने अनेक मराठी, हिंदी चित्रपटांत उत्तम अभिनयाचे दर्शन घडवले असून ऋषी मनोहरनं टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटांतून स्वत:ला अभिनेता म्हणून सिद्ध केलं आहे. त्यामुळे या दोघांची नवी जोडी मोठ्या पडद्यावर किती खुलून दिसते याचं कुतूहल प्रेक्षकांना आहे. त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून मिळणार यात शंका नाही.