प्रसिद्ध अभिनेता आर माधवनच्या नावाची कान फिल्म फेस्टिवलमध्ये बरीच चर्चा झाली. माधवनच्या ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’ या आगामी चित्रपटाचा प्रिमियर कान फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये झाला. या चित्रपटाची संपूर्ण जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटाची कथा लेखन, दिग्दर्शन स्वतः आर माधवननं केलं आहे. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत आर माधवननं त्याच्या चित्रपटाविषयी सांगितलं. हा चित्रपट तयार करताना आलेली आव्हानं आणि सध्याची बॉलिवूड चित्रपटांची परिस्थिती यावर भाष्य केलं. आर माधवनचा ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

काही दिवसांपूर्वीच निर्माता दिग्दर्शक करण जोहरनं बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांबाबत एक वक्तव्य केलं होतं. “जर बॉलिवूडमध्ये ‘केजीएफ’सारखे चित्रपट तयार केले गेले तर अशा चित्रपटांवर बंदी आणली जाते किंवा मग मेकर्सना त्याचे परिणाम भोगावे लागतात.” असं करण जोहरनं एका मुलाखतीत म्हटलं होतं. करणच्या या वक्तव्याबद्दल जेव्हा आर माधवनला विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला, “असं अजिबात नाहीये. ‘पुष्पा’, ‘आरआरआर’, ‘केजीएफ चॅप्टर २’, ‘बाहुबली’ हे दाक्षिणात्य चित्रपट तुफान चालले पण त्यासोबतच ‘द कश्मीर फाइल्स’, ‘गंगूबाई काठियावाड़ी’ आणि ‘भूल भुलैय्या २’ या बॉलिवूड चित्रपटांनी देखील चांगली कमाई केली.”

आणखी वाचा- बापाला लेकीचं भारी कौतुक! मुलीचा फोटो शेअर करत निकने व्यक्त केल्या भावना

आर माधवन पुढे म्हणाला, “सर्व दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवलं आणि सर्वच बॉलिवूड चित्रपट अपयशी ठरले असं अजिबात झालेलं नाही. जेवढे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत त्यांची कथा, कथा मांडण्याची पद्धत आणि मेकर्स आणि अभिनेत्यांनी चित्रपटासाठी दिलेला वेळ. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या आहेत. कोणत्यांही अभिनेत्यानं किंवा दिग्दर्शक निर्मात्यांनी चित्रपट घाईघाईत तयार केलेला नाही. ही मेहनत चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनाही दिसते. त्यावेळी त्यात भाषा किंवा इतर कोणतीही गोष्ट बाधा आणू शकत नाही. मला वाटतं की बॉलिवूडकरांनी मनातून ही भीती काढून टाकायला हवी. विषय चांगला असेल तर प्रेक्षक चित्रपट नक्कीच पाहणार.”

दरम्यान आर माधवनचा ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’ हा चित्रपट ३ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पण या चित्रपटाची सर्वात विशेष गोष्ट अशी आहे की कोणत्याही भाषेसाठी डबिंग करण्यात आलेलं नाही. प्रत्येक भाषेसाठी स्वतंत्र आणि ओरिजिनल संवाद लिहून रेकॉर्ड करण्यात आले आहेत. या चित्रपटाचं शूटिंग ८ देशांमध्ये करण्यात आलं असून यात ५० वर्षांचा प्रवास दाखवण्यात आला आहे.