बॉलिवूडमधील अजरामर व्यक्तिमत्व म्हणून राज कपूर यांच्याकडे पाहिले जाते. १९४० ते १९६०च्या दशकात बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले. राज कपूर यांना शोमॅन म्हणून ओळखले जाते. राज कपूर यांनी त्यांच्या कारकिर्दीत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासोबतही अनेकदा काम केले. लता मंगेशकर आणि राज कपूर यांच्यात एक वेगळेच नाते होते. एकदा तर राज कपूर यांनी लता मंगेशकर यांना रात्री १ वाजता फोन केला होता. लेखक राहुल रवैल यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. राहुल यांनी नुकतंच राज कपूर आणि लता मंगेशकर यांच्याबाबतचा किस्सा शेअर केला आहे. यावेळी ते म्हणाले की, "राज कपूर यांच्याकडे दूरदृष्टी होती. ते नेहमी मोठी स्वप्न पाहायचे. त्याच्या मनात नेहमीच भव्यदिव्य कल्पना असायच्या. त्यांनी त्यावेळी 'जिस देश मे गंगा बेहती है' या चित्रपटाला आर्थिक पाठबळ दिले होते." "या चित्रपटात 'आ अब लौट चले' हे गाणे होते. या गाण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात कोरस आणि संगीतकारांची गरज होती. मात्र त्यावेळी तांत्रिक अडचणींमुळे मल्टी ट्रॅक रेकॉर्डिंग करणे शक्य नव्हते. मात्र राज कपूर यांनी 'आ अब लौट चलें' या गाण्याचे रेकॉर्डिंग पहाटे तीन वाजता केले होते. या गाण्याचे रेकॉर्डिंग एका रस्त्यावर अनेक कोरस गायकांसोबत झाले." असेही त्यांनी सांगितले. "त्यावेळी रस्त्यावर फारशी वर्दळ नसायची. हे रेकॉर्डिंग सुरु असतानाच रात्री १ वाजता त्यांनी लता मंगेशकर यांना फोन केला आणि म्हणाले, 'मला नाही वाटतं की क्लायमॅक्स गाणे नायिकेशिवाय पूर्ण होईल. खरतर त्यावेळी राज कपूर यांना लता मंगेशकर यांच्याकडून एक आलाप हवा होता. ज्याला स्वत: लता मंगेशकर यांनीही होकार दर्शवला होता." असेही त्यांनी म्हटले. हेही वाचा : “जे बोलायचंय ते माझ्यासमोर बोला”, आराध्याला ट्रोल करणाऱ्यांवर अभिषेक बच्चन भडकला! राज कपूर यांना त्यांच्या 'सत्यम शिवम सुंदरम' या चित्रपटात गायिका म्हणून लता मंगेशकर यांनाच कास्ट करायचे होते. राज कपूर यांची ही ऑफर लता मंगेशकर यांनी आधी स्वीकारली होती. पण नंतर त्यांनी चित्रपटात काम करण्यास नकार दिला.