इंडिया गॉट लेटेंट( India’s Got Latent) हा शो त्यामध्ये केले गेलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे मोठ्या चर्चेत राहिला. या शोचा होस्ट समय रैना(Samay Raina) व रणवीर अलाहाबादिया यांच्यावर मोठी टीका करण्यात येत आहे. समय रैनाच्या ‘इंडिया गॉट लेटेंट’मध्ये रणवीर अलाहाबादिया पाहुणा कलाकार म्हणून सहभागी झाला होता. यावेळी त्याने एका स्पर्धकाबरोबर बोलताना आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर समय रैना, रणवीर अलाहाबादिया तसेच या शोला मोठे ट्रोल केले गेले. त्यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या, त्यांना समन्सदेखील बजावले गेले. आता या सगळ्या वादानंतर समय रैनाने कॅनडामध्ये पहिला शो केला.

वादानंतर समय रैनाचा पहिला शो

समय रैनाने शोमध्ये विनोदी पद्धतीने या वादावर भाष्य केले. त्या शोमध्ये हजेरी लावलेल्या एका चाहत्याने समय रैनाचे कौतुक करीत लिहिले की, एवढ्या तणावपूर्ण परिस्थितीतही त्याने त्याच्या विनोदामध्ये सर्व प्रेक्षकांना गुंतवून ठेवले. या चाहत्याने ही पोस्ट नंतर डिलिट केली. मात्र, तोपर्यंत अनेकांनी ती शेअर केली होती. शुभम दत्ताने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, ” प्रचंड मानसिक तणावात असलेला, डोळ्याखाली डार्क सर्कल्स असून त्याचा चेहरा पडलेला, त्याचे केस विस्कटलेले होते. धुळीने माखलेली काळी हुडी घातलेल्या एका २५ वर्षीय तरुणाला मी स्टेजवर येताना पाहिले. स्टेजवर आल्यानंतर त्याचे पहिले वाक्य होते, माझ्या वकिलांची फी भरल्याबद्दल धन्यवाद.” या चाहत्याने पुढे लिहिले, “त्याच्या शोमध्ये जवळजवळ ७०० लोक आले होते. शो सुरू होण्याआधी हे सगळे लोक त्याला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न करत होते. हे सर्व पाहून समय रैनाच्या डोळ्यात अश्रू आले होते.”

समय रैनाने या शोमध्ये प्रेक्षकांना उद्देशून म्हटले, “या शोमध्ये असे अनेकवेळा घडेल की, जेव्हा तुम्हाला वाटेल की मी खूप चांगला विनोद करू शकतो, मात्र त्यावेळी बीअर बायसेप्सला आठवा”, शोच्या शेवटी त्याने म्हटले, “कदाचित सध्या माझा वेळ खराब चालला आहे, पण लक्षात ठेवा मी समय आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रणवीर अलाहाबादिया हा भारतातील प्रसिद्ध यूट्यूबर आहे. बीअर बायसेप्स असे त्याच्या यूट्यूब चॅनेलचे नाव असून त्याच्या पॉडकास्ट शोसाठी तो प्रसिद्ध आहे. त्याच्या पॉडकास्टमध्ये आतापर्यंत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी हजेरी लावली आहे, ज्यामध्ये अनेक बॉलीवूड कलाकारांचादेखील समावेश आहे. इंडिया गॉट लेटेंटमधील त्याच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याने माफी मागितली होती. त्याच्यावर महाराष्ट्रासह आसाममधून तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. नुकत्याच झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने त्याला अटकेपासून संरक्षण दिले आहे.