ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे काल पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. विक्रम गोखले यांनी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी या तिन्ही ठिकाणी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. विक्रम गोखले यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिनेता शशांक केतकर याने एक पोस्ट लिहित विक्रम गोखलेंना श्रद्धांजली वाहिली आहे.

शशांकने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्याचा आणि विक्रम गोखले यांचा एक फोटो पोस्ट केला. हा फोटो पोस्ट करताना त्याने लिहिले, “विक्रम काका…अभिनय क्षेत्रात यायच्या आधी ऑस्ट्रेलियाला ज्यांच्या समोर पहिल्यांदा नाटकाचा प्रयोग सादर केला ते विक्रम काका. अभिनय क्षेत्रात आल्यावर ज्यांच्याबरोबर त्यांचा नातू म्हणून ‘कालाय तस्मै नमः’ या मालिकेत पहिल्यांदा काम केलं ते विक्रम काका. ‘गोष्ट तशी गमतीची’च्या एका प्रयोगाला मी फक्त १५ मिनिट राहिलेली असताना थिएटर वर पोहोचलो, काका नाटक बघायला ४० मिनिट आधी येऊन बसले होते. फक्त १५ मिनिट आधी आलास? स्टार झालास का रे? असं म्हणून कान पळणारे विक्रम काका.”

आणखी वाचा : “माझ्या आईकडून मिळालेला वारसा….” ; प्रतीक बब्बरने स्मिता पाटील यांच्याशी होणाऱ्या तुलनेबद्दल केलं भाष्य

पुढे तो म्हणाला, “त्यांनी लिहिलेल्या ‘colour called gray’ या फिल्मच्या टीममध्ये तू हवास असं म्हणणारे विक्रम काका. २०१० ते २०२२ आणि त्याही आधी… आवाज, डोळे, देहबोली, भाषा याचा वापर ज्यांच्या कडून शिकण्याचा प्रयत्न केला ते विक्रम काका. प्रत्येक माणसाला त्याच्या कामापलीकडेही ठाम मतं हवीत हे मनावर बिंबवणारे विक्रम काका. तुम्ही कायम होताच आणि असालच.”

दरम्यान ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा सर्वच माध्यमांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनही केलं, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आघात’ हा चित्रपटाचे समीक्षकांनी कौतुक केले होते. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.

हेही वाचा : Photos: विक्रम गोखलेंच्या निधनाने शोककळा, अंतिम दर्शनावेळी कुटुंबीयांना अश्रू अनावर

कला क्षेत्रातील योगदानाबद्दल विक्रम गोखले यांना २०१५ मध्ये विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशनतर्फे बलराज साहनी पुरस्कार, क्रीडामहर्षी हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार यांसारख्या पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले. पुलोत्सव सन्मान यांसह चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार अशा महत्त्वाच्या पुरस्कारांचेही गोखले मानकरी होते. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Story img Loader