मराठमोळा अभिनेता सुमित राघवन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. अगदी सामाजिक ते राजकीय अशा सर्वच विषयांवर सुमित राघवन बेधडकपणे सोशल मीडियावर आपलं मत मांडताना दिसतो. मुंबईतील सामान्य लोकांच्या समस्यांबाबत तो अनेकदा आवाज उठवतानाही दिसतो. अनेकदा त्याचे ट्वीट किंवा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आताही काहीसं असंच काहीसं घडलं आहे. नुकतंच मुंबई महानगरपालिकेला उद्देशून सुमितनं केलेलं ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

मागच्या काही काळापासून मुंबईच्या द्रुतगती मार्गांवर अनधिकृत दुकानं किंवा विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सुमितनं नुकत्याच केलेल्या ट्वीटमध्ये याच प्रकाराकडे मुंबई महानगरपालिकेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या ट्विटरवर त्यानं पश्चिम द्रुतगती मार्गावरील एक व्हिडीओ शेअर करत एक पोस्टही लिहिली आहे. ज्यात त्यानं मुंबई महानगरपालिकेला टॅगही केलं आहे.

आणखी वाचा- ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’चं शाहरुख खान कनेक्शन! जयदीपची ‘ती’ पोस्ट चर्चेत

सुमितनं वांद्रे ते दहिसर या मार्गावर असलेल्या अनधिकृत दुकानांचा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, ‘मेट्रो कारशेड्स तुम्ही हलवली. पण दहिसर टोलनाक्यावरील किंवा पश्चिम द्रुतगती मार्गावरील अनधिकृत दुकाने हलवण्यात आलेली नाहीत. मुंबईकर मुंबईबाहेर जातील आणि तुम्हाला या अतिक्रमण करणाऱ्यांसोबत शहरात आनंदाने राहता येतील, याची काळजी घ्या.’ आपल्या या ट्वीटमधून सुमितनं मुंबईच्या रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या या अनधिकृत दुकानांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुमित राघवनचं हे ट्वीट आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ज्यात त्यानं मुंबई महानगरपालिकेबरोबरच राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबईचे पालक मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री कार्यालयालाही टॅगही केलं आहे. दरम्यान मुंबई किंवा सामान्य मुंबईकरांच्या समस्यांवर भाष्य करण्याची सुमित राघवनची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही अनेकदा त्यानं मुंबईतील समस्यांवर भाष्य केलं आहे. आता या ट्विटवरुन काही कारवाई होते का? महापालिका यावर काही उत्तर देते का? हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.