‘आई कुठे काय करते’ ही मालिका नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. या मालिकेमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे लाखो चाहते आहेत. या लोकप्रिय मालिकेमध्ये अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा कायमच चर्चेत असते. अभिनेते मिलिंद गवळी हे ही भूमिका साकारतात. नुकतंच मिलिंद गवळींनी मराठी भाषेबद्दल पोस्ट शेअर केली आहे.

मिलिंद गवळी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते इन्स्टाग्रामद्वारे फोटो-व्हिडीओ पोस्ट करत असतात. नुकतीच शेअर केलेली त्यांची एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. यात त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते काही प्राण्यांबरोबर मजा-मस्ती करताना दिसत आहे. याला त्यांनी हटके कॅप्शनही दिले आहे.
आणखी वाचा : “जगभरात कुठंही अशुद्ध भाषा…” नागराज मंजुळेंचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

मिलिंद गवळींची पोस्ट

“शब्दविना संवाद”!!!

“माझी भाषा ही माझी आहे. त्यामुळं शुद्ध, अशुद्ध असं काही नसतं. मुळात जगभरात कुठंही अशुद्ध भाषा हा प्रकारच नसतोय. अमेरिकी भाषातज्ज्ञ नोम चॉम्स्की यांच्या शब्दांत सांगायचं तर भाषेचा हेतू हा शुद्ध ठरवणं, असा नसतो, तर संवाद साधणं असतो’,” असं परखड मत दिग्दर्शक व अभिनेते नागराज मंजुळे यांनी सोमवारी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘मुंबई टाइम्स कार्निव्हल २०२३’च्या समारोपामध्ये व्यक्त केलं.
वर्षांवर्ष मला असं वाटत होतं की
मराठी जी माझी मातृभाषा आहे , ती फक्त काहींनाच स्पष्ट, शुद्ध बोलता येते, काहींना ती येतच नाही आणि ते अडाणी आहेत, अशुद्ध बोलतात, गावंढळ बोलतात, त्यातला एक मी पण आहे असं मला वाटत होतं, ज्याला मराठी भाषा नीट बोलता येत नाही, मी अशुद्ध बोलतो.
पण नागराज मंजुळे यांनी खरच या वर पुन्हा एकदा मला ह्या गोष्टीवर विचार करायला लावला आहे.
माझी एक कोपरगाव ची मोठी मामी, अशुद्ध मराठी बोलायची किंवा गावंढळ मराठी बोलायची किंवा गावाकडची मराठी बोलायची असं म्हणूया.
पण पण तिचे शब्द इतके प्रेमळ, मधुर ,मन शांत करणारे असायचे,
कानांना गोड वाटणारे असायचे, आणि या उलट,
मधल्या काळामध्ये , अतिशय मराठीवर प्रभुत्व असणारी एक व्यक्ती, (त्यांचं नाव ? आता ते कशाला मारायला!!!! ….,सांगतोय मी?)
मराठीचा प्रत्येक शब्द कसा उच्चारावा याचं ज्ञान असणारी व्यक्ती, पण त्या व्यक्तीने तोंडातून शब्द काढला रे काढला ले काढला की,माझ्या कानांत कर्कश्य आवाज यायचा , पूर्वी नाही का सॉफ्ट ड्रिंक च्या बाटलीच पत्र्याचं बुच, लहान मुलं फरशीवर घासायचे , आणि एक आवाज यायचा,कानाला त्रास देणारा, तसंच काहीसा, कर्कश्य.
त्यामुळे चांगलं काय, वाईट काय,शुद्ध काय, अशुद्ध काय
काहीच कळत नव्हता,
नागराज मंजुळे च्या बोलण्याने खरंच वेगळा विचार करायला लावला.
मला कधी कधी कोणतीही भाषा नकोच असं सुद्धा वाटतं,
कुत्र्या मांजरांबरोबर ज्या वेळेला मी असतो,
त्यावेळेला ते खूप काही काही बोलत असतात माझ्याशी, मला कळत असतं तर बोलणं, त्यांना काय हवं नको ते मला कळतं किंवा मला का होऊ नको ते त्यांना पण कळतं, असं मला वाटतं.
मग ही कोणती भाषा आहे ?, वेगळीच भाषा आहे का? जी कुठल्याही शाळेत शिकवली जात नाही किंवा भाषाच नाही?
पण किती छान असतो हा अनुभव.
जाऊ द्या, मला वेगळ्या वेगळ्या मानवी भाषांचा, अभ्यास करावाच लागणार आहे ,
पशुपक्षी कुत्रे मांजरे यांच्या भाषेत तर काही मला तुमच्याशी संवाद साधता येणार नाही,
आणि अनिरुद्ध तर काय , कर्कश्य बोलल्याशिवाय राहणार नाही, असे मिलिंद गवळींनी म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. मिलिंद गवळी गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी माध्यमांमध्येही काम केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचे फोटो, व्हिडीओ ते सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.