‘मीत: बदलेगी दुनिया की रीत’, ‘इश्क सुभान अल्लाह’ आणि ‘साड्डा हक – माय लाइफ माय चॉइस २’ या टीव्ही शोमधून अभिनेता आशुतोष सेमवाल लोकप्रिय झाला. आशुतोष सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर दोन वर्षांनी आशुतोषने साखरपुडा उरकला आहे. आशुतोष अरेंज मॅरेज करतोय.
आशुतोष सेमवालच्या होणाऱ्या पत्नीचे नाव मनीषा भट्ट आहे. आशुतोषने मनीषाबरोबर साखरपुडा झाल्याची घोषणा केली आहे. मनीषाबरोबर आयुष्याचा नवीन प्रवास सुरू करण्यासाठी आशुतोष खूप उत्सुक आहे.
इ-टाइम्सशी बोलताना आशुतोष म्हणाला, “मनीषाच्या रूपात योग्य जोडीदार मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. आमच्या लग्नाबद्दल आणि तिच्याबरोबर माझे संपूर्ण आयुष्य घालवण्याबद्दल मी खूप उत्साहित आहे. ती मला प्रेरणा देते, तिला परिस्थितींना कसे सामोरे जायचे हे चांगलंच माहित आहे. ती आजूबाजूला असली की सकारात्मता वाटते, ती माझ्या आयुष्यात आली यासाठी मी स्वतःला नशीबवान समजते.”
दोघांनी आधी लग्नाला दिलेला नकार
मनीषाशी भेट कशी झाली, असं विचारल्यावर आशुतोष पुढे म्हणाला, “मी तिला पहिल्यांदा एका अरेंज्ड मॅरेज सेटअपमध्ये भेटलो होतो. आमच्या आई- वडिलांनी आमची ओळख करून दिली होती. त्यावेळी आम्ही लग्नासाठी तयार झालो नाही. काही वैयक्तिक कारणांमुळे, ती तिचे शिक्षण वेळेवर पूर्ण करू शकली नाही आणि सध्या ती एमए (मास्टर ऑफ आर्ट्स) पूर्ण करत आहे आणि मलाही माझ्या अभिनयावर लक्ष केंद्रित करायचे होते. पण आम्ही मित्र म्हणून बोलणं सुरू ठेवलं आणि भेटू लागलो. त्यानंतर आम्ही लग्नासाठी तयार आहोत या निर्णयावर पोहोचलो.”
आशुतोषच्या कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे, कारण त्याच्या बहिणीचं लग्न झालं आणि त्याचा साखरपुडा झाला आहे. “आम्ही सर्वजण खूप आनंदी आहोत, कारण नुकतंच माझी बहीण लक्ष्मीचं लग्न झालं. २१ एप्रिल रोजी लक्ष्मीचं लग्न झाला आणि त्याच्या काही दिवस आधी म्हणजे १४ एप्रिलला माझा साखरपुडा झाला,” असं आशुतोष सेमवाल म्हणाला.
अभिनेता आशुतोष सेमवाल यापूर्वी अभिनेत्री सिमरन बुधारुपबरोबर रिलेशनशिपमध्ये होता, पण सप्टेंबर २०२३ मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर आता आशुतोषने आयुष्यात पुढे जायचं ठरवलं असून त्याने मनीषाबरोबर साखरपुडा केला आहे.