Aishwarya and Avinash Narkar on Dance Videos : मराठी सिनेसृष्टीतील नव्वदच्या दशकामधील एव्हरग्रीन जोडपं म्हणजे अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. गेली अनेक वर्षे हे दोघेही नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. याशिवाय दोघे सोशल मीडियावरही तितकेच सक्रीय असतात. सोशल मीडियावर ते त्यांचे अनेक डान्स, व्यायाम आणि मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. कधी कधी या व्हिडीओमुळे त्यांना ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो. प्रसंगी या ट्रोलर्सना ऐश्वर्या नारकर त्यांच्या शैलीत चांगलंच उत्तरही देतात. अशातच त्यांनी पुन्हा एकदा या सगळ्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
ऐश्वर्या व अविनाश नारकरांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी डान्स आणि व्यायामाच्या व्हिडीओवरील नेटकऱ्यांच्या तसंच मुलगा अमेयची काय प्रतिक्रिया असते. याबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं. यावेळी ऐश्वर्या नारकरांनी असं म्हटलं की, “स्वत:चा आनंदच महत्त्वाचा असतो. तुम्ही कितीही चांगलं करा किंवा कितीही छान गोष्टी करा, त्याबद्दलही काहीतरी बोलणारे एक-दोन लोक असतातच. बोलणाऱ्याचे तोंड आपल्याला धरता येत नाही. त्यामुळे आपण स्वत:चा आनंद गमवायचा का? तर नाही.”
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “अविनाशच्या व्यायामाचं बोलायचं झालं तर, तो गली अनेक वर्षे व्यायाम करत आहे. लॉकडाऊनमध्येही तो हे सगळं घरातल्या घरात करतच होता. आम्ही कुठे बाहेर गेलो तरी अनोळखी जागी तो त्याचा व्यायाम करतोच. त्यामुळे गेल्या १५ वर्षांत तरी त्याने कधी व्यायामासाठी कंटाळा केल्याचं मला आठवतच नाही.” यानंतर ऐश्वर्या व अविनाश नारकरांनी त्यांच्या डान्स रील्सवर मुलगा अमेयची काय प्रतिक्रिया असते? यावरही उत्तर दिलं.
याबद्दल ऐश्वर्या म्हणाल्या की, “आमच्या रील्स व्हिडीओवर अमेयची तशी कधी काही प्रतिक्रिया नव्हती. त्याला त्याचेच इतके व्याप आहेत की, तो यावर कधी काही बोलला नाही. त्यात आम्ही कलाकार असल्याने अभिनय तर आमचा पिंडच आहे. त्यामुळे त्याला कधी काही असं वेगळं वाटलं नाही. मी जर एक गृहिणी असते आणि अचानक मी जर डान्स वगैरे करायला लागले असते, तर ते वेगळेपण जाणवलं असतं आणि ते कधी त्याच्या बाबतीत जाणवलं नाही. त्यामुळे तशी आमच्यात त्याची कधी मध्यस्थी नसते.”
यानंतर अविनाश नारकरांनी असं म्हटलं की, “आम्ही तिघेही कधीच कुणाच्या बाबतीत दखलअंदाजी करत नाही आणि हे आमच्याकडून आजाणतेपणे होतं. म्हणजे मी ऐश्वऱ्याला कधीही असं म्हणत नाही की, तू हे कर किंवा नको करु किंवा एखाद्या ऑडिशनसाठी सुद्धा जाऊ की नको असं ऐश्वर्याही मला विचारत नाही आणि मी सुद्धा तसं काही सांगत नाही. जाणं किंवा न जाणं हा निर्णय ज्याचा त्याचा असतो. चांगलं-वाईट याबद्दल एकमेकांना सूचना देत असतो. तिकडे जा, खूप मोठा प्रोजेक्ट आहे किंवा ते आणखी चांगलं होऊ शकतं. अशा काही चर्चा होतच असतात.”
यापुढे ते असं म्हणाले की, “मी कधीच कोणत्या गोष्टीला नाव ठेवत नाही. त्या त्या गोष्टींचा फक्त आनंद घेत असतो. त्यामुळे अमेयलासुद्धा तीच सवय आहे. उलट तो आम्हाला काही नवीन ट्रेंड आले आहेत त्याबद्दल सांगत असतो किंवा अगदी एखाद्या डान्सची स्टेपसुद्धा सुचवतो. तो उत्तम डान्सर आहे. आम्ही जेव्हा त्याचा पहिला डान्स पाहिला होता, तेव्हा आम्ही सगळे चकित झालो होतो आणि मी तेव्हा मेकअपमनपासून ते सर्वांना दाखवलं होतं.”