‘अकबर का बल बिरबल’, ‘मेरे अंगने में’ आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’सारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केलेल्या चारू असोपाने गेल्या वर्षी तिचा पती राजीव सेनशीपासून घटस्फोट घेतला आणि ती मुंबईत मुलीसह वेगळ्या घरात राहू लागली. नुकतंच एका मुलाखतीमध्ये चारूने हे स्पष्ट केलं आहे कि ती एकटी असल्याने तिला मुंबईत घर मिळणं कठीण झालं आहे.

चारू असोपाने गेल्या वर्षी राजीव सेनपासून वेगळं व्हायचा निर्णय घेतला आणि मुलीसह मुंबईत वेगळ्या अपार्टमेंटमध्ये राहायला गेली. पूर्वी चारू ही 1 BHK अपार्टमेंटमध्ये राहत होती आणि आता लवकरच ती 2 BHK फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार आहे. याबद्दल चारू म्हणते की एकटी आई आणि अभिनेत्री असल्यामुळे मुंबईतील लोक तिला घर देण्यास टाळाटाळ करत होते. यामुळे त्या दोघींना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

आणखी वाचा : ‘उरी’चा दिग्दर्शक आदित्य धर अडचणीत; आगामी बिग बजेट चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच झाले ‘इतक्या’ कोटींचे नुकसान

‘इटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये चारू म्हणाली, ” मुंबईत शिफ्ट घर शोधणे सोपे नाही. या भयानक उन्हात मी घर शोधत राहिलो. रोज बाहेर जावून यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी भटकत होते. हे सगळं खरंच खूप थकवणारं आहे.” मुंबईत घर का मिळत नाही याविषयी बोलताना ती म्हणाली “यामागे दोन गोष्टी प्रामुख्याने आहेत, पहिली म्हणजे मी अभिनेत्री आहे आणि दुसरी म्हणजे एकटी पालक म्हणजेच आई आहे, या दोन्ही समस्या आहेत. मला एक फ्लॅट आवडला होता, पण ते कुटुंब फार रूढीवादी होते. जेव्हा त्यांना कळले की मी एकटी माझ्या मुलीसह इथे राहणार आहे तेव्हा त्यांना नेमकं काय खटकत आहे हे मला लगेच जाणवलं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चारू असोपा व राजीव सेन १६ जून २०१९ रोजी विवाहबंधनात अडकले होते. परंतु, लग्नाच्या तीन वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. जून २०२२ मध्ये ते औपचारिकरित्या वेगळे होणार असल्याची माहिती समोर आली. त्यांना जियाना ही मुलगी असून घटस्फोटानंतर ती चारूबरोबरच राहणार आहे. तिच्याचसाठी सध्या चारू एका मोठ्या घराच्या शोधात आहे.