आज ८ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन. महिलांचे कर्तृत्व आणि सामर्थ्याचा सन्मान करण्याचा हा दिवस. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अनेक कलाकार सोशल मीडियावर शुभेच्छा देताना दिसत आहे. नुकतंच अभिनेते मिलिंद गवळी यांनी महिला दिनानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेते मिलिंद गवळी हे आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे कायमच चर्चेत असतात. या मालिकेमध्ये ते अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी साकारलेल्या स्त्रीपात्राचे काही फोटो पाहायला मिळत आहे. त्याला कॅप्शन देताना त्यांनी महिला दिनानिमित्ताने खास पोस्ट केली आहे.
आणखी वाचा : “शिर्डीच्या साईबाबांनी नवसाने मुलगा दिला, मुंबईच्या महालक्ष्मीने मुंबईत…” मिलिंद गवळींची भावूक पोस्ट
मिलिंद गवळींची पोस्ट
“जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
खरंतर वर्षातले 365 दिवस हे महिला दिनच आहेत, आणि ते असायलाच हवेत.
पण ठीक आहे काही पुरुषांना आठ मार्चला त्याची आठवण करून द्यावी लागते म्हणून आजचा महिला दिन.
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले.
काही देशात जसे बल्गेरिया आणि रोमानिया येथे हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मुले आपली आई आणि आजी यांना भेटवस्तू देतात.
पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलांचे खूप हाल झाले ,त्यांच्यावर खूप अत्याचार झाले,
आजही परिस्थिती फार बदलली आहे असं नाही आहे.
सावित्रीबाई आणि त्यांचे पती ज्योतिबा फुले यांनी इ.स. १८४८ मध्ये पुणे येथील भिडेवाड्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली.
ती खरी आपल्या देशात महिलांच्या जागृतीसाठी सुरुवात होती ,
शिक्षण महत्त्वाचं आहे, नाही पण , चार भिंतीतल्या शाळां मधलं शिक्षण महत्त्वाचा आहेच, पण त्याचबरोबर महिलांनी worldly wise होण गरजेच आहे, जे मी माझ्या लेकीला मिथिलेला @mithi_laa तिच्या लहानपणापासून सांगत आलो आहे.
घरातल्या चार भिंतींच्या बाहेर , वास्तवातलं शिक्षण खूपच महत्त्वाचा आहे.
ज्यांना ते मिळालं किंवा मिळवता आलं , त्या आज पुरुषांपेक्षा खूप खूप पुढे निघून गेले आहेत,
निसर्गानेच स्त्रीला इतकं शक्तिशाली बनवला आहे, की त्या गोष्टीची स्त्रीला जाणीव नव्हती, पण एकदा का ती जाणीव झाली की तिला कोणीही अडवू शकत नाही…
आदिशक्ती ती, प्रभूची भक्ती ती, झाशीची राणी ती, मावळ्यांची भवानी ती, प्रयत्नांना लाभलेली उन्नती ती, आजच्या युगाची प्रगती ती.
ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती माया आहे, तीच सुरुवात आहे आणि सुरुवात नसेल तर बाकी सारं व्यर्थ आहे.
माऊली तुला शतशत प्रणाम..,,” असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. मिलिंद गवळी गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी माध्यमांमध्येही काम केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. त्यामुळेच ते घराघरात पोहोचले.