Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सध्या सिद्धू आणि पूर्वीची लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. पण, सिद्धूला हे लग्न अजिबात करायचं नसतं…त्याचं भावनावर मनापासून प्रेम असतं आणि यामुळेच त्याने भावनाच्याही नकळत तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं असतं.
सिद्धूने देवीच्या उत्सवादरम्यान भावनाशी लग्न केलंय ही गोष्ट कोणालाच माहिती नसते. अगदी भावना देखील हे मंगळसूत्र नेमकं कोणी घातलंय याचा शोध घेत असते. सिद्धू अनेकदा तिला सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो मात्र, घरात निर्माण झालेली परिस्थिती आणि भावनाची वाटणारी भीती या सगळ्या गोष्टींचा विचार करून सिद्धू या विषयावर कोणासमोर काहीच बोलत नसतो. पण, आता लवकरच मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे.
सिद्धूने भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घातल्याचं सत्य लवकरच वेंकीसमोर येणार आहे. यामुळे वेंकी प्रचंड संतापतो. तो या सगळ्या गोष्टींचा जाब विचारण्यासाठी सिद्धूकडे जाणार आहे. यावेळी वेंकी ३ जणांना चिठ्ठ्या लिहितो. लक्ष्मीच्या चिठ्ठीत वेंकी लिहितो, “आई…भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घालणारा सिद्धूच आहे” तर, वेंकी भावनासाठी देखील चिठ्ठी लिहितो यात, “सिद्धीराज गाडेपाटलांनीच तुझा एवढा मोठा विश्वासघात केलाय.” असं लिहिलेलं असतं.
याशिवाय वेंकी तिसरी चिठ्ठी पूर्वीच्या नावाने लिहितो, “पूर्वी तू ज्याच्यावर इतकं प्रेम करतेस त्याचं आधीच लग्न झालंय.” या तिन्ही चिठ्ठ्या वेंकी सिद्धूला दाखवून हातवारे करून सांगतो, “आता जर तू भावनाची जबाबदारी समोर येऊन स्वीकारली नाहीस तर या सगळ्या चिठ्ठ्या मी त्या-त्या व्यक्तीला देईन.” वेंकीमुळे सिद्धूची चांगलीच कोंडी होणार आहे.
प्रेक्षकांना मालिकेचा हा विशेष भाग येत्या ७ जून पाहायला मिळणार आहे.
मालिकेच्या पुढच्या भागात काय पाहायला मिळणार?
आता भरसभेत सिद्धू भावनाचा स्वीकार करणार आहे. वेंकी सिध्दूला इशारा देतो, “हीच तुझी संधी आहे, आता भावनाशी झालेलं लग्न जाहीर कर” एवढ्यात सभा सुरू होते आणि श्रीनिवासच्या भाषणादरम्यान गोंधळ होतो. पाटलांच्या उमेदवारीवर देखील प्रश्न उपस्थित केले जातात. जनतेला शांत करण्यासाठी सिध्दू मंचावर जाऊन मी तुमच्या मतदारसंघाचा जावई असल्याचं सांगतो आणि थेट गर्दीत जाऊन भावनाचा हात धरतो आणि “हीच माझी पत्नी…” असल्याचं जाहीर करतो.